बेचव रस्समवरून लग्न मोडलं, पण अखेर दुस-याशी लागलं
By Admin | Updated: February 1, 2016 14:05 IST2016-02-01T14:00:28+5:302016-02-01T14:05:21+5:30
रिसेप्शनच्या जेवणामधलं रस्सम बेचव होतं, म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची आणि नंतर एका लांबच्या नातेवाईकाने लग्न करत शेवट गोड केल्याची घटना घडली आहे.

बेचव रस्समवरून लग्न मोडलं, पण अखेर दुस-याशी लागलं
>ऑनलाइन लोकमत
टूमकूर ( कर्नाटक), दि. १ - रिसेप्शनच्या जेवणामधलं रस्सम बेचव होतं, म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची आणि नंतर एका लांबच्या नातेवाईकाने लग्न करत शेवट गोड केल्याची घटना घडली आहे.
एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी असा हा सीन असला तरी ती सत्यकथा आहे. टुमकूरमधल्या कुमीगल येथे हा प्रकार रविवारी घडला आहे. लग्नाच्या आदल्या रात्री रिसेप्शन ठेवण्यात होतं आणि जवळपास ३०० पाहुणेही आले होते.
एकीकडे वधु आणि वर विधींमध्ये व्यस्त होते आणि दुसरीकडे भोजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी वराच्या वडिलांनी जेवणामधल्या रस्समची चव खराब असल्याचा आरडाओरडा केला आणि मुलीच्या घरच्यांशी वाद घातला. हा प्रकार घडल्यानंतर विधी सोडून नवरदेव आला आणि तोही वडिलांच्या बाजुने बोलायला लागला. अखेर, बंगळूरचा असलेला नवरदेव आणि त्याचे कुटुंब चक्क सभामंडप सोडून निघून गेले.
मुलगा व मुलीने स्वखुशीने एकमेकांना निवडलेले असताना असा प्रकार का घडावा असा प्रश्न वधुपित्यांना पडला. अत्यंत विचित्र अवस्थेत सापडलेल्या वधुपित्याने मुलीशी लग्न करायला कुणी इच्छुक आहे का याची विचारणा केली आणि एक दूर दूरचा नातेवाईक त्यांच्या सहाय्यास आला आणि त्याने लग्नास सहमती दर्शवली.
त्यामुळे रस्समच्या चवी वरून एकाशी मोडलेले लग्न दुस-याशी लागले आणि शेवट गोड झाला.