कोळशाची वाहतूक जलमार्गाने केल्यास १० हजार कोटींची बचत
By Admin | Updated: November 29, 2015 17:40 IST2015-11-29T03:05:38+5:302015-11-29T17:40:25+5:30
कोळशाची वाहतूक देशांतर्गत जलमार्गाने केल्यास वर्षाला १० हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.

कोळशाची वाहतूक जलमार्गाने केल्यास १० हजार कोटींची बचत
नवी दिल्ली : कोळशाची वाहतूक देशांतर्गत जलमार्गाने केल्यास वर्षाला १० हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.
देशातील १११ प्रमुख नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून मान्यता देण्याच्या विधेयकास संसदेच्या चालू अधिवेशनात मंजुरी मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पीएचडी चेम्बर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या वार्षिक कार्यक्रमाला गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले, देशांतर्गत जलमार्गाच्या माध्यमाने सामग्रीसोबतच प्रवासी वाहतुकीसही प्रोत्साहन देता येईल. याशिवाय या मार्गाने केवळ कोळशाची वाहतूक केली तरी वर्षाला १०,००० कोटी रुपयांची बचत करता येणे शक्य आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पर्यावरणस्नेही, स्वस्त माध्यम
जलमार्ग हे वाहतुकीचे पर्यावरणस्नेही आणि स्वस्त माध्यम आहे. एका अश्वशक्तीने (एचपी) भूपृष्ठमार्गे १५० किलो, रेल्वेने ५०० किलो तर जलमार्गाने ४,००० किलो वजन वाहून नेता येते.
त्याचप्रमाणे एक लिटर इंधनाने सडकमार्गे प्रतिकिमी २४ टन मालाची वाहतूक करता येते. दुसरीकडे एवढ्याच इंधनाने रेल्वेत प्रति किमी ८५ टन आणि जलमार्गे १०५ टन सामान वाहून नेणे शक्य आहे. याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.