जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर
By Admin | Updated: July 30, 2014 00:21 IST2014-07-29T23:26:10+5:302014-07-30T00:21:17+5:30
संततधार : इगतपुरी तालुक्यात विक्रम; पालखेडचा साठा वाढला

जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर
जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूरसंततधार : इगतपुरी तालुक्यात विक्रम; पालखेडचा साठा वाढलानाशिक : गेल्या ४८ तासांत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे छोट्या मोठ्या नदी, नाल्यांना पूर आला आहे. इगतपुरी तालुक्यात विक्रमी पाऊस झाला असून, अनेक गावांचा घोटीशी संपर्क तुटला आहे. भावली धरण परिसरात सर्वाधिक पाऊस झाला आहे. दिंडोरी तालुक्यात धामण, कोळवण या नद्यांना पूर आला आहे. सिन्नर तालुक्यात म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत आहे.
घोटी/इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या घाटमाथ्यासह पश्चिम भागात गेल्या ४८ तासांपासून पावसाची हजेरी कायम आहे. तालुक्याच्या भावली धरण परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, सर्वात कमी पावसाची नोंद पूर्वभागात झाली आहे. पावसामुळे दारणा नदीला पूर आला असून, पुरामुळे नदीलगतची भात शेती पाण्याखाली गेली आहे. घोटीजवळील काळुस्ते रस्त्यावरील दारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असल्याने चौदा गावांचा घोटी शहराशी संपर्क तुटला आहे.
घाटमाथा व पश्चिम पट्ट्यात पाऊस कोसळत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. दारणा नदीचे उगमस्थान असलेल्या भावली धरण परिसरात चोवीस तासांत ४१५ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली. दारणा नदीला पूर आला आहे. पुरामुळे चौदा गावांच्या रहदारीचा काळुस्ते पूल पाण्यात गेल्याने काळुस्ते, कांचनगाव, औचितवाडी, शेणवड बु., खडकवाडी, तळोघ, जुन्हावने, भरवज, निरपण, कुरुंगवाडी, मांजरगाव, बोरवाडी, दरेवाडी, सारुक्तेवाडी आदि गावांचा घोटीशी संपर्क तुटला आहे. घोटी वैतरणा रस्त्यावर नवीन वाकी खापरी धरणात या वर्षापासून पाण्याचा साठा केल्याने धरणाचे पाणी कोरपगाव व भावली गावाजवळील रस्त्यावर आले असून, हा रस्ता पाण्याखाली गेल्याने पन्नासहून अधिक गावांचा घोटी शहराशी संपर्क तुटला आहे. तालुक्यातील पूर्वभागातील सर्वतीर्थ टाकेद ते आधारवड रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील जनतेचा संपर्क तुटला.
प्रशासन सज्ज
निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती लक्षात घेता यावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, तहसीलदार महेंद्र पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पट्टीचे पोहणारे, जीवरक्षक जवान तैनात केले आहेत.
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे परिसरातील बंधारे भरले आहे. एकीकडे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत असली तरी उंबरदरी धरण क्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तितकी वाढ झालेली नाही.
ठाणगाव पट्ट्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. यावर्षीही पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही या भागात पावसाने हजेरी लावली नव्हती. अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येत दिंडोरी येथील धामण नदीला आलेला पूर.होत्या; मात्र त्यामुळे म्हाळुंगी नदीला पाणी आले नव्हते.
अकोले तालुक्यातील विश्रामगड परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने म्हाळुंगी नदीला पाणी वाहू लागले आहे. ठाणगाव परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
दिंडोरी :ङ्क्तशहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, विविध नदी-नाल्यांना पूर आला आहे. धरण क्षेत्रात दमदार पावसाच्या हजेरीने पाणी साठ्यातही वाढ होत असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाने उशिरा का होईना हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पंधरा दिवसापासून अधून मधून रिपरिप सुरू होती.समाधानकारक पाऊस झाल्याने भाजीपाला लागवड सुरु होणार आहे