रेल्वे पुनर्जन्माचा संकल्प!

By Admin | Updated: February 27, 2015 06:08 IST2015-02-27T03:05:52+5:302015-02-27T06:08:08+5:30

सरकारच्या पाठीशी असलेल्या ४००हून अधिक खासदारांना बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट हेतू मनात ठेवून मुद्दाम रेल्वेमंत्री म्हणून नेमलेल्या

Resurgence resolution of the train! | रेल्वे पुनर्जन्माचा संकल्प!

रेल्वे पुनर्जन्माचा संकल्प!

नवी दिल्ली : सरकारच्या पाठीशी असलेल्या ४००हून अधिक खासदारांना बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट हेतू मनात ठेवून मुद्दाम रेल्वेमंत्री म्हणून नेमलेल्या सुरेश प्रभूंनी नेहमीचा लोकानुनयाचा आणि राजकीय अभिनिवेशाचा ‘ट्रॅक’ सोडून पूर्णपणे ‘हटके’ असा रेल्वे अर्थसंकल्प गुरुवारी लोकसभेत सादर केला. साहजिकच कोणाला काय मिळाले आणि कोणाकडे दुर्लक्ष केले यादृष्टीने रेल्वे अर्थसंकल्पाकडे पाहण्याची सवय झालेल्या राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांची प्रभूंनी निदान वरकरणी तरी घोर निराशा केली. प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ न करण्याची आणि काहीही झाले तरी यापुढेही रेल्वे सरकारीच राहील, याची घोषणा प्रभूंनी आवर्जून केली.

भारतीय रेल्वे हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे हा कणा मजबूत झाल्याखेरीज बळकट अर्थव्यवस्थेचा डोलारा उभारणे शक्य होणार नाही, हे सूत्र ठेवून रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेचा पसारा आणखी वाढविण्याआधी आहे तोच पसारा मजबूत आणि आर्थिकदृष्ट्या टिकावू बनविण्याचा रेल्वेच्या पुनर्जन्माचा संकल्प जाहीर केला. या तिपेडी संकल्पाचा पहिला भाग म्हणून प्रभू यांनी भारतीय रेल्वेच्या सध्याच्या जराजीर्ण अवस्थेचे वास्तवचित्र मांडणारी श्वेतपत्रिका सभागृहात सादर केली. त्यानंतर त्यांनी अर्थ संकल्पाचे ४७ पानी भाषण केले आणि याचा पुढचा भाग म्हणून रेल्वेच्या पंचवार्षिक पुनर्जन्म योजनेचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ वर्षअखेर देशापुढे मांडण्याचे वचनही दिले.
स्वत: ‘सीए’ असलेल्या प्रभूंवर राजकीय खूशमस्करीचे कोणतेही दडपण नाही व लोकांच्या अफाट आशा-आकांक्षांच्या बळावर खुर्चीत बसलेल्या पंतप्रधानांचा पूर्ण पाठिंबा आहे. शिवाय सरकारच्या पाच वर्षांच्या कालखंडातील हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे प्रभूंना राजकारणाऐवजी निखळ देशहिताच्या दृष्टीने अर्थसंकल्प तयार करण्याची पूर्ण मोकळीक मिळाली. याआधी असाच प्रयत्न तृणमूल काँग्रेसच्या दिनेश त्रिवेदी यांनी केला होता. पण तेवढ्यावरून डॉ. मनमोहन सिंग यांचे आघाडी सरकार पडण्याची वेळ आली होती. अखेर त्रिवेदी यांची उचलबांगडी करून नव्या रेल्वेमंत्र्यांनी दुरुस्त्यांच्या नावाखाली पूर्णपणे नवा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. आता तसे होण्याची सूतराम शक्यता नाही. जे कोणीतरी करायची गरज होती ते, इंग्रजीत ज्याला, ‘टेकिंग दि बुल बाय इट्स हॉर्न’, असे शिंगावर घेण्याचे काम प्रभूंनी केले आहे. भाषणाचा समारोप करताना रेल्वेमंत्र्यांनी आत्मविश्वासाने जाहीर केले की, ‘असेच चालायचे’ या भावनेतून यापुढे रेल्वेचा कारभार चालणे शक्य नाही. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी रेल्वेला मजबूत पायांवर उभे राहावेच लागेल. रेल्वेचा कायाकल्प घडवून आणला जाऊ शकतो आणि ते काम फत्ते करून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे स्वप्न नक्कीच साकार होईल. स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे हे एकच ध्येय माझ्या डोळ््यापुढे आहे ते साध्य करण्यासाठी माझ्या सर्व शक्ती एकवटल्या आहेत!
अंतिम उद्दिष्ट नजरेआड न करता हे साध्य करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी चार प्रमुख ध्येये या अर्थसंकल्पात समाविष्ट असल्याचे सांगितले. प्रत्येक प्रवाशास रेल्वे प्रवास आनंददायी वाटावा या पातळीपर्यंत रेल्वेचा दर्जा उंचावणे, अपघातात होणारा प्रत्येक मृत्यू क्लेषकारी असल्याने रेल्वे प्रवास पूर्णपणे सुरक्षित करणे, क्षमता वाढविणे आणि वित्तीय स्वयंपूर्णताही त्यांची चतु:सुत्री होती. येत्या पाच वर्षांत प्रवासी क्षमता २.१ कोटींवरून तीन कोटी करणे, रेल्वेमार्गांची लांबी १.१४ लाख किमीवरून २० टकक्यांनी वाढवून १.३८ लाख किमी करणे आणि मालवाहतूक क्षमता एक अब्ज टनांवरून दीड अब्ज टन करणे यांचा त्यात समावेश आहे.
ही चार उद्दिष्टे साकार करण्यासाठी पाच मुख्य कामे हाती घेण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यात दीर्घकालीन दृष्टी ठेवून मध्यम कालावधीचे उपाय हाती घेणे, रेल्वे ही सर्वांचीच असल्याने ती उत्तम पद्धतीने चालविण्यात राज्यांना व खासगी उद्योगांनाही भागीदार करून घेणे, आगामी पाच वर्षांत ८.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट डोळ््यापुढे ठेवून हा निधी उभारण्याचा रोड मॅप त्यांनी दाखविला.

Web Title: Resurgence resolution of the train!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.