नितीशकुमारांविरुद्ध बंडाचा झेंडा राज्यसभेसाठी बंडखोर रिंगणात
By Admin | Updated: June 10, 2014 00:52 IST2014-06-10T00:14:56+5:302014-06-10T00:52:01+5:30
संयुक्त जनता दलाने पक्षप्रवक्ते पवन वर्मा आणि गुलाम रसूल बालयावी यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंडाळी निर्माण झाली आहे.

नितीशकुमारांविरुद्ध बंडाचा झेंडा राज्यसभेसाठी बंडखोर रिंगणात
फराज अहमद/ नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाने पक्षप्रवक्ते पवन वर्मा आणि गुलाम रसूल बालयावी यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात बंडाळी निर्माण झाली आहे.
जदयूच्या तीन बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना पक्षातील बंडखोरांचे आणि इतर पक्षांचे समर्थन आहे. जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री करण्यात आले असले तरी अंतिम निर्णय नितीश कुमार घेत असल्याने पक्षात असंतोष आहे. जदयूचे राज्यसभेचे तिसरे उमेदवार पक्षाचे अध्यक्ष शरद यादव आहेत.
लोकसभेत निवडून गेलेल्या रालोआच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिल्याने राज्यसभेतील रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता.
शरद यादव, वर्मा आणि बालयावी यांनी सोमवारी राज्य विधासभेत अर्ज दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत नितीशकुमार, बिहार जदयूचे प्रदेशाध्यक्ष बशिष्ट नारायणसिंह आणि मुख्यमंत्री मांझी होते.
बंडखोर उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबत जदयूचे बंडखोर आमदार होते. दरम्यान बंडखोर आमदारांनी शरद यादव यांच्या उमेदवारीला आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत.
बंडखोर उमेदवारांमध्ये साबीर अली आहेत. अली हे एकेकाळी वरिष्ठ सभागृहात लोकजनशक्ती पार्टीचे एकमेव खासदार होते. त्यांनी एलजेपीला सोडचिठ्ठी देऊन जदयूसोबत घरोबा केला होता. त्यानंतर मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी भाजपात प्रवेश घेतला, परंतु भाजपाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांच्या विरोधामुळे त्यांना भाजपातून काढण्यात आले.
दुसरे बंडखोर उमेदवार दिलीप जयस्वाल भाजपाचे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांना भाजपाने किसनगंज येथून लोकसभेचे तिकीट दिले होते. तिसरे बंडखोर उमेदवार व रिअल इस्टेटमध्ये मोठे नाव असलेल्या अनिल शर्मा यांनी जदयूकडून लोकसभा निवडणूक लढवली होती.
भाजपाचे बिहारमधील वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची बंडखोरांसोबत बैठक झाली. यावरून हे भाजपाचे राजकारण असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तीनही अपक्ष उमेदवारांनी भाजपाचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांची भेट घेतली.