ममता बॅनर्जींना खरा धोका ‘एम’ फॅक्टरचा

By Admin | Updated: May 14, 2014 04:01 IST2014-05-14T04:01:12+5:302014-05-14T04:01:12+5:30

ममता बॅनर्जी निश्चिंत होत्या, ३२ नाहीतर ३० जागा तरी कुठे गेल्या नाहीत या हवेत तृणमूल काँग्रेस होती. सुरुवातला हवाही तशीच होती.

The real risk of Mamta Banerjee is 'M' factor | ममता बॅनर्जींना खरा धोका ‘एम’ फॅक्टरचा

ममता बॅनर्जींना खरा धोका ‘एम’ फॅक्टरचा

दिलीप तिखिले, कोलकाता-

ममता बॅनर्जी निश्चिंत होत्या, ३२ नाहीतर ३० जागा तरी कुठे गेल्या नाहीत या हवेत तृणमूल काँग्रेस होती. सुरुवातला हवाही तशीच होती. पण ‘एम’ नावाचे वादळ प. बंगालात शिरले आणि ममतांच्या बुरुजांना हादरे बसू लागले. तृणमूलच काय माकप आणि काँग्रेसलाही या वादळाचे तडाखे जाणवू लागले. प. बंगालात मोदी फॅक्टर चालणार नाही असेच ममतांसह सर्वांना वाटत होते. त्यामुळेच सुरुवातीला मोदींनी पुढे केलेला सहकार्याचा हात ममता बॅनर्जींनी झिडकारून लावला. निवडणुकीचे वातावरण जसजसे तापू लागले तसे मोदींचे प. बंगालचे दौरेही वाढू लागले. ममतांनी केलेली संभावना जिव्हारी लागलेल्या मोदींनी मग तृणमूल काँगे्रसलाच लक्ष्य करून ममतांना पुरते घायाळ केले. वास्तविक पाहता शारदा चिटफंड, पोर्टेट आदी मुद्दे जुनेच होते. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत व नंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या मुद्यांचा काही एक परिणाम न होता तृणमूल काँग्रेसने प्रभावी कामगिरी केली होती. पण यावेळी नरेंद्र मोदींनी हे घोटाळे अतिशय प्रभावीपणे जनतेपुढे ठेवल्याने ममता मोठ्या अडचणीत आल्या आणि त्यांच्या प्रचाराचा बहुतांश भाग सारवासारव करण्यातच गेला. मतदानाचा शेवटच्या दोन टप्प्यात तर राज्यात असे चित्र निर्माण झाले की, यावेळी लढत केवळ भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातच आहे. काँग्रेस आणि माकप प्रचारात बॅकफ्रूटवरच राहिली. आजवर राज्यात भाजपा कधीही आक्रमक नव्हती पण मोदींच्या उपस्थितीमुळे प्रदेश भाजपात चैतन्य निर्माण झाले. मतदारांवरही त्याचा प्रभाव जाणवला. १६ मे च्या निकालात त्याचे प्रतिबिंब निश्चितच दिसेल. गेल्या निवडणुकीत भाजपाला एकमेव दार्जिलिंगची जागा मिळाली. यात यावेळी किमान दोन जागांची भर पडू शकते. गेल्या निवडणुकीत भाजपाचे जे ५ ते ६% मताधिक्य होते ते यावेळी १२ ते १५ टक्क्यावर जाईल असा अंदाज आहे. काही ठिकाणी तर २० ते ३० टक्के मताधिक्य भाजपाला मिळेल अशी स्थिती आहे. तृणमूलच्या गेल्या निवडणुकीत १९ जागा होत्या यावेळी फारतर तीन ते चार जागांची भर पडू शकते. शिवाय अनेक ठिकाणी या पक्षाच्या मताधिक्यात मोठी घट शक्य आहे. गेल्यावेळी या पक्षाला राज्यात ४१ टक्के तर डाव्या पक्षाला ३८% मते मिळाली होती. तृणमूलच्या मताधिक्यातील काँग्रेसची मते कमी केली तर डाव्यांचे मताधिक्य अधिक होते. यावेळी मोदी हवेचा फटका तृणमूला बसू शकतो. त्यामुळे यावेळी ममताची घसरगुंडी निश्चित मानली जात आहे. काँग्रेसला सहा जागा कायम राखणे अवघड जाणार आहे. त्यांची जांगीपूरची एक जागा अडचणीत आहे. राष्टÑपती मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी काठावर आहेत. डावी आघाडी २०११ च्या पराभवातून अद्याप सावरलेली नाही. भाजपाच्या प्रभावाचा फायदा मिळून यावेळी ही आघाडी २००९ ची स्थिती कायम राखू शकेल असा अंदाज आहे.

Web Title: The real risk of Mamta Banerjee is 'M' factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.