कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएल विजयाच्या जल्लोषादरम्यान स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी हजारो लोक स्टेडियमच्या आत जमले होते. सुरुवातीला या कार्यक्रमासाठी पास देण्यात आले होते. परंतु काही लोकांनाच पास मिळाला आणि जेव्हा सर्वांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा गेट उघडताच मोठी गर्दी झाली.
हजारो लोकांनी जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला आणि सर्व दिशांनी लोक आत येऊ लागले. प्रवेशद्वाराचा रस्ता छोटा होता. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि बॅरिकेड खाली पडले. काही वेळातच लोक त्याखाली दबले गेले आणि गर्दीने त्यांना चिरडलं. पोलिसांनी जखमी आणि बेशुद्ध लोकांना उपचारासाठी ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेलं. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, ज्यांना पास मिळाले आणि ज्यांना मिळाले नाहीत ते दोन्ही लोक आत धावले.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जणांचे मृतदेह बॉरिंग हॉस्पिटलमध्ये आहेत आणि इतर चार जण वैदेही हॉस्पिटलमध्ये आहेत. सहा जणांवर वैदेही हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी बॉरिंग हॉस्पिटलला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी ११ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत आणि जखमींवर सरकारकडून मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे.
"लाखो लोक आले होते"
मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी कार्यक्रमस्थळी झालेल्या गर्दीबद्दल आधीच माफी मागितली आहे. "आम्ही ५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली होती. लाखो लोक आले होते... कार्यक्रम १० मिनिटांत संपला. आम्ही सर्वकाही सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहोत... ही उत्साही तरुणांची गर्दी आहे" असं म्हटलं आहे.