‘अच्छे दिन’ आणण्याऐवजी भाजपाच्या पळवाटा
By Admin | Updated: June 18, 2014 05:29 IST2014-06-18T05:29:30+5:302014-06-18T05:29:30+5:30
महागाई वाढण्यास साठेबाजी कारणीभूत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला.

‘अच्छे दिन’ आणण्याऐवजी भाजपाच्या पळवाटा
नवी दिल्ली : महागाई वाढण्यास साठेबाजी कारणीभूत असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला. सरकार आपले अपयश झाकण्यासाठी तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे चांगले दिवस आणण्यात असमर्थ ठरत असल्याने कारणे शोधत असल्याची टीका काँग्रेसने केली.
सरकारमधील भ्रष्टाचारामुळे वस्तूंच्या किमती वाढल्याचे भाजपा विरोधी पक्ष असताना छातीठोकपणे सांगत होता. सरकारमध्ये असताना काँग्रेस महागाईसाठी जी कारणे देत होता, भाजपा त्याचा विरोध करीत होता आणि आता सत्तेत आल्यावर भाजपाला ती कारणे योग्य वाटत आहेत, असे काँग्रेस सरचिटणीस अजय माकन म्हणाले.
साठेबाजीमुळे महागाई वाढल्याचे सांगून अरुण जेटली यांनी महागाई रोखण्यासाठी साठेबाजीला आळा घालण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या.
मोदींनी काही दिवसांपूर्वी अर्र्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे म्हटले होते. जेटली यांचे वक्तव्य त्याच्याशी मिळते-जुळते असल्याचे समजण्यात येत आहे.
जनतेच्या आशा- आकांक्षा पूर्ण करू शकत नसल्याने आणि निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे चांगले दिवस येऊ शकत नसल्याने भाजपा आणि सरकार आपल्या अपयशासाठी कारणे शोधत आहे, असे माकन म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आने वाले है’ हे गाजलेले घोषवाक्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे होते.
सरकार पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यास कटिबद्ध आहे. दुसरीकडे राज्य सरकारांना तुटवड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साठेबाजांवर लक्ष ठेवावे लागेल, असे जेटली म्हणाले.
सरकार चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करीत आहे. पंतप्रधानांनी अर्थव्यवस्था बिकट असल्याचे सांगून काही कठोर पावले उचलावे लागतील, असे याआधी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)