अहमदाबाद विमान अपघातातून एकमेव वाचलेले प्रवासी, दीवचे रहिवासी आणि ब्रिटिश नागरिक विश्वास रमेश अखेर आपल्या घरी परतले आहेत. मात्र, ३७१ किलोमीटरचा प्रवास करून दीव येथील घरी पोहोचल्यानंतरही त्यांना अपघाताचा आणि त्यात गमावलेल्या भावाचा धक्का पचवता आलेला नाही. भाऊ अजय रमेशचा मृतदेह घेऊन जाताना ते बेशुद्ध पडले होते आणि त्यांना रडू कोसळले, हे दृश्य हृदयद्रावक होते.
या सर्वात भीषण विमान अपघातातून विश्वास रमेश यांचा बचाव हा केवळ एक चमत्कार मानला जात आहे. एअर इंडियाच्या 'AI-१७१' विमानाला आग लागून ते कोसळले असताना, आपण कसे बचवलो, हे त्यांना स्वतःलाही समजत नाहीये. दीवमधील त्यांच्या घराबाहेर आता माध्यमांचा गराडा पडला असून, 'पीपली लाईव्ह' चित्रपटातील दृश्यांसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अहमदाबाद पोलिसांनी त्यांचे निवेदन नोंदवले असले तरी, ते आता लोकांमध्ये आकर्षण आणि कुतूहलाचे केंद्र बनले आहेत. प्रत्येकजण या एकमेव वाचलेल्या प्रवाशाला भेटण्यास उत्सुक आहे.
'लकी मॅन'च्या डोळ्यांतून अश्रू थांबेनाविश्वास रमेश यांना अपघाताचा मोठा मानसिक धक्का बसला आहे, त्यामुळे ते सध्या माध्यमांपासून दूर राहणे पसंत करत आहे. ते स्वतः बचावले असले तरी, या दुर्घटनेत त्यांनी आपला भाऊ अजय रमेश गमावला आहे. अजयच्या दुःखद निधनानंतर विश्वास रमेशच्या कुटुंबातील मित्र आणि नातेवाईक सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचत आहेत. मात्र, अद्याप धक्क्यातून सावरले नसतानाच लोकांचे आणि माध्यमांचे प्रश्न त्यांना भंडावून सोडत आहेत. यामुळे त्यांचे घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे.
विश्वास रमेश यांच्या कुटुंबात त्यांच्या पालकांव्यतिरिक्त एकूण चार भाऊ होते. अजयच्या निधनानंतर आता विश्वास रमेश आणि त्यांचे इतर दोन भाऊ नील आणि सनी असे तिघेच उरले आहेत. कुटुंबाच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वास रमेश यांचा लंडनमध्ये कपड्यांचा व्यवसाय होता, जो त्यांनी काही काळापूर्वी बंद केला. दीवमधील त्यांच्या कुटुंबाकडे मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या काही बोटी आहेत. ब्रिटिश नागरिकत्व असलेले विश्वास रमेश काही महिने लंडनमध्ये आणि काही महिने दीवमध्ये राहत असत.