नवी दिल्ली - राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. भाजपाने मविआचे नेते जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांच्यावर आक्षेप घेत निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला. ही मते बाद करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली. त्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचला.
मागील ५ तासांपासून ही मतमोजणी रखडलेली होती. त्यानंतर आत्ताच केंद्रीय निवडणूक आयोगाची दीड तासांपासून सुरू असलेली बैठक संपली आहे. या बैठकीत मविआ आणि भाजपा यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांवर चर्चा झाली. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांचीही ऑनलाईन उपस्थित होती. निवडणूक आयोगाची बैठक संपल्यानंतर आता थोड्याच वेळात निर्णय येण्याची अपेक्षा आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?मी मतदान करून माझ्या पक्षाचे प्रतिनिधी होते त्यांनाच मतपत्रिका दाखवली. कागद माझ्या छातीवर होता. कॅमेरा माझ्या मागे होता. मतपत्रिका बंद केली, मतदान केले आणि गेटवर आलो. तोपर्यंत कुणीही आक्षेप घेतला नव्हता. अर्ध्या तासाने माझ्या मतदानावर आक्षेप घेतल्याचं कळालं. मी कुठलाही गुन्हा केलाय असं मला वाटत नाही. काहीही कारण नसताना हा खेळ लांब घेऊन निघाले आहेत. काहीतरी रडीचा डाव खेळायचा असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी भाजपावर केला.
निवडणूक आयोगाने मागवले होते व्हिडीओनिवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाचे व्हिडीओ मागवले होते. शिवसेनेचा आरोप होता की, आमदार रवी राणा यांनी मतदानावेळी त्यांच्यासोबत हनुमान चालीसा आणली होती. व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्येही हे स्पष्ट दिसते. निवडणूक प्रक्रियेचा हा भंग आहे. निवडणूक आचारसंहितेच्या विरोधात आहे असं म्हटलं होतं.