Raja Raghuwanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पती-पत्नीच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे फक्त दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला नाही, तर जिथे ही घटना घडली, त्या मेघालय राज्यालाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. मेघालयातील शिलॉंग येथे सोनम आणि राजा हनिमून साजरा करण्यासाठी गेले होते, मात्र तिथेच सोनमने राजाचा काटा काढला. या घटनेचा मेघालयातील पर्यटनावर मोठा परिणाम पडला आहे.
राजा रघुवंशीच्या हत्येसाठी पत्नी सोनमने मेघालय निवडले. प्रियकराच्या मदतीने सोनमने आधी राजाला ठार मारले अन् नंतर त्याचा मृतदेह दरीत फेकला. या घटनेनंतर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. पर्यटक आता मेघालयाला सुरक्षित मानत नाहीत. अनेक हॉटेलमधील बुकिंग रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे येथील स्थानिक लोकही खूप निराश झाले आहेत.
हॉटेल उद्योगावर परिणामशिलाँगमधील अल्पाइन हॉटेलचे व्यवस्थापक सचिन म्हणतात की, या घटनेनंतर हॉटेल उद्योगावर परिणाम झाला आहे. ५ ते १० टक्के बुकिंग रद्द झाल्या असून, नवीन बुकिंगही कमी झाली आहे. मेघालय पूर्णपणे सुरक्षित आहे, पण राज्याला बदनाम करण्याचा कट रचला जातोय.
मेघालय टुरिझम फोरमचे कार्यकारी सदस्य कमल अग्रवाल असेही म्हणतात की, मेघालय पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल बुकिंग रद्द करण्यात येत आहेत. पर्यटन उद्योगाचे नुकसान होत आहे. हॉटेल बुकिंग रद्द केल्याने टॅक्सी उद्योगावरही परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी सुमारे १६ लाख पर्यटक मेघालयाला भेट देतात, परंतु या घटनेनंतर पर्यटकांच्या संख्येवर मोठा परिणाम पडू शकतो.