मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेला असताना हत्या झालेल्या राजा रघुवंशी याच्या हत्या प्रकरणी सुरू असलेल्या तपासामधून पोलिसांना आणखी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी ही ज्या संजय वर्मा नावाच्या व्यक्तीसोबत मोबाईलवर तासनतास बोलायची तो नंबर तिचा प्रियकर राज कुशवाहा हाच वापरत होता, असे तापासामधून उघड झाले आहे. सोनमने मार्च महिन्यात २५ दिवसांमध्ये ११२ वेळा संजय वर्मा नावाच्या व्यक्तीशी संभाषण केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर हा संजय वर्मा कोण याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम आणि त्या क्रमांकावरील व्यक्तीमध्ये बराच वेळ संभाषण चालायचं. हा क्रमांक संजय वर्मा नावाच्या व्यक्तीचा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अधिक तपास केल्यावर धक्कादाय माहिती समोर आली. तसेच या फोन नंबरचा वापर दुसरा तिसरा कुणी नाही तर खुद्द राज कुशवाहा हा करत असल्याचे समोर आले होते.
सोनम रघुवंशी ही संजय वर्मा नावाच्या व्यक्तीसोबत सातत्याने संपर्कात होती, असे वृत्त प्रसारमाध्यमांमधून समोर आले होते. त्यानंतर इंदूर पोलिसांनी मेघालय पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. संजय वर्मा या नावाच्या आडून राज कुशवाहा हाच ओळख लपवून सोनम रघुवंशी हिच्यासोबत संपर्कात होता, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आता पुढील तपासासाठी हा क्रमांक आणि त्याच्याशी संबंधित कॉल डिटेल्सच्या रेकॉर्डच्या आधारावर तपासाला गती देण्यात आली आहे.
दरम्यान, इंदूर येथील रहिवासी असलेल्या राजा सूर्यवंशी याचा विवाह सोनम रघुवंशी हिच्यासोबत ११ मे रोजी झाला होता. त्यानंतर हे दाम्पत्य हनिमूनासाठी मेघालयमध्ये गेले होते. तिथून हे दोघेही रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केल्यावर राजा सूर्यवंशी याचा मृतदेह एका दरीत सापडला होता. तर बेपत्ता असलेल्या सोनम हिला पोलिसांनी काही दिवसांनंतर अटक केली होती.