देशाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करुन देणार

By Admin | Updated: June 8, 2015 02:44 IST2015-06-08T02:44:19+5:302015-06-08T02:44:19+5:30

२०१९ पर्यंत देशातील घराघरात चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.

Provide 24 hours electricity supply to the country | देशाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करुन देणार

देशाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करुन देणार


मुंबई : ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा बचतीच्या दृष्टीने यंदाचे वर्ष कमालीचे यशस्वी ठरले असून २०१९ पर्यंत देशातील घराघरात चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहात ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखती दरम्यान गोयल बोलत होते. २०२० सालापर्यंत देशातील वीज उत्पादनात ५० टक्के वाढ करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून त्यादृष्टीन विविध आघाड्यांवर काम सुरु आहे. यंदा कोळसा उत्पादनात ८.३ टक्के तर वीज उत्पादनात ८.४ टक्के वाढ झाल्याचा सांगत या क्षेत्रातील चढता आलेख गोयल यांनी यावेळी मांडला. वीज तोटा ३.६ टक्क्यांवर आणतानाच उत्पादन क्षमता २२ हजार ५६६ मेगावॅटने तर वीज वितरणाचे जाळे २२ हजार १०० सर्किट किलोमीटरने वाढविण्यात आली आहे. वीज उत्पादनाने पहिल्यांदाच १ लाख कोटी युनिटचा आकडा पार केला आहे. वीज वितरण कंपन्यांमध्ये १.०९ लाख कोटींची गुंतवणूक व्हावी म्हणून नव्या योजना अंमलात आणण्यात येणार असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील कोळसा खाणी कर्नाटकला देण्यात आल्याच्या आरोपाबाबत बोलताना गोयल म्हणाले की, देशात केवळ सहा राज्यात कोळशाचे उत्पादन होते. प्रत्येक राज्यातील विजेचा प्रश्न सोडवायचे असेल तर कोळशासारख्या राष्ट्रीय संपत्तीच्या वाटपात समन्वय साधणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आधीच दोन महत्वाच्या आणि जास्त क्षमतेच्या खाणी आहेत. शिवाय अन्य राज्यातूनही कोळसा पुरविला जातो. त्यामुळे प्रांतिक भूमिका घेणे चुकीचे असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. येत्या पाचवर्षात कोल इंडियाच्या उत्पादनात दुपटीने वाढ करण्यात येणार असून, ते प्रतिवर्ष १०० कोटी टन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
तर, पर्यावरण पूरक ऊर्जानिर्मितीसाठी सौरऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे. २०१४-१५ या सालात देशातील सौरऊर्जेच्या क्षमतेत ४२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. १४ राज्यांतील १७ सौरप्रकल्पांना मान्यता देण्यात आली. याद्वारे देशांतर्गत सौरऊर्जेची क्षमता तीसपट वाढविण्याचे लक्ष्य आहे, असे गोयल म्हणाले. एलईडी बल्बच्या माध्यमातून किमान दहा टक्के वीज वाचविता येणार आहे. त्यासाठी येत्या तीन वर्षात देशभर एलईडी दिवे बसविणार. २०१६ पर्यंत ९० लाख एलईडी बल्बद्वारे रस्ते प्रकाशमान करणार. पारदर्शक खरेदी प्रक्रीयेमुळे ३१० रुपयांच्या एलईडी बल्बची किंमत ८२ रुपयांपर्यंत खाली आणली. १८ राज्यांतील १५१ शहरांत घरेलू कुशलता प्रकाश कार्यक्रम सुरु करण्यात आल्याचे गोयल म्हणाले.

Web Title: Provide 24 hours electricity supply to the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.