Priyanka Gandhi Speech on Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. मुंबई हल्ल्याचा हवाला देत प्रियंका गांधींनी सरकारच्या उत्तरदायीत्वावर बोट ठेवले. प्रियंका गांधींनी पहलगाममध्ये मारल्या गेल्या पर्यटकांबद्दल उल्लेख केला. तेव्हा सत्ताधारी बाकावरील खासदारांनी त्यांना टोकलं. त्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, मी आजही शिवस्तोत्र वाचून आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लोकसभेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, "26 जण मारले गेले. पती, मुलांचा मृत्यू झाला. मेलेले भारतीय होते." त्यावेळी सत्ताधारी बाकावरील खासदार म्हणाले, "हिंदू."
सत्ताधारी खासदारांनी हिंदू म्हटल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, "मी आजही शिवतांडव स्तोत्र म्हणून आले आहे."
प्रियंका गांधी म्हणाल्या, मी वर्तमानाबद्दल बोलतेय
खासदार प्रियंका गांधी बोलत असताना काही खासदारांनी काँग्रेस सरकारच्या काळातील मुद्दा मांडला. त्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, 'तुम्ही इतिहासाबद्दल बोलत रहा. मी वर्तमानबद्दल बोलत राहीन. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी का घेतली गेली नाही? गृहमंत्र्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही?', असा सवाल प्रियंका गांधींनी केला.
अमित शाह हसत होते
"तुम्ही ११ वर्षे सत्तेत आहात, जबाबदारी घ्यायला हवी. काल मी पाहत होते, गौरव गोगोई यांनी जबाबदारीबद्दल बोलताना राजनाथ सिंह मान हलवत होते, पण गृहमंत्री अमित शाह हसत होते. उरी-पुलवामाच्या वेळी राजनाथ सिंह गृहमंत्री होते, आज ते संरक्षणमंत्री आहेत. अमित शाहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत. त्यांचा राजीनामा का घेतला नाही?", असे प्रियंका गांधी म्हणाल्या.