पंतप्रधानांचे जेटलींनी केले तोडभरून कौतुक
By Admin | Updated: May 14, 2014 08:39 IST2014-05-14T04:16:59+5:302014-05-14T08:39:30+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी मावळते पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांची तोंडभरून स्तुती केली असून त्यांची व्यक्तिगत सचोटी नेहमीच वादातीत राहिली, असे आग्रहाने नमूद केले आहे.

पंतप्रधानांचे जेटलींनी केले तोडभरून कौतुक
नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षाचा नेता म्हणून वाद आणि मतभेदाचे अनेक प्रसंग आले असले व प्रसंगी सडकून टीका केली असली तरी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी मावळते पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांची तोंडभरून स्तुती केली असून त्यांची व्यक्तिगत सचोटी नेहमीच वादातीत राहिली, असे आग्रहाने नमूद केले आहे. पंतप्रधान पदावरून पायउतार होण्यास काही दिवस राहिले असताना जेटली यांनी मंगळवारी डॉ. सिंग यांच्याविषयीचे आपले मत सविस्तर ब्लॉग लिहून नोंदविले. त्यात त्यांनी मनमोहन सिंग यांना ‘एक शहाणा माणूस’ असे संबोधून म्हटले की, मुळातच त्यांचे व्यक्तिमत्त्व विद्वत्तापूर्ण असल्याने कोणताही विषय हाताळताना पंतप्रधानांची नेहमीच पूर्ण तयारी झालेली असायची. डॉ. मनमोहन सिंग राज्यसभा सभागृहाचे नेते असून जेटली विरोधी पक्षनेते आहेत. गेली १० वर्षे सरकारचे नेतृत्त्व केल्यानंतर डॉ.सिंग प्रतिष्ठा व आब राखून पायउतार होत आहेत, असे गौरवोद््गार जेटली यांनी काढले. जेटली ब्लॉगमध्ये लिहितात, पदावर नसले तरी डॉ. सिंग यांचे एक ज्येष्ठ मुत्सद्दी राजकारणी व निष्ठावंत व्यक्ती म्हणून देशाला मार्गदर्शन मिळत राहील. मात्र डॉ. सिंग यांनी योग्य वेळी ताठपणाने उभे राहून असहमती नोंदविली असती तर त्यांचा सन्मान आणखी वाढला असता, असेही जेटली यांनी नमूद केले. आपल्याला मर्या दित अधिकार दिलेले आहेत व सर्व प्रमुख निर्णय पक्ष व पक्षाच्या प्रथम कुटुंबाच्या (गांधी कुटुंब) संमतीनेच घ्यावे लागणार आहेत, याची त्यांना कल्पना होती. जेटली म्हणतात की, मला पंतप्रधानांना गेली १० वर्षे अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यापैकी पहिल्या पाच वर्षांत संसदेत त्यांनी केलेले प्रत्यही प्रत्येक वक्तव्य विरोधी पक्षनेता म्हणून मी स्वत: ऐकले व प्रत्येक वेळी त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले. जेटली म्हणतात, डॉ. सिंग एक फार उत्तम वित्तमंत्री होते हे निर्विवाद. १९९१ मध्ये आर्थिक सुधारणांची सुरुवात करताना त्यांना त्यांचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडून खूप पाठबळ मिळाले. ज्या काँग्रेसने नेहमीच नियंत्रित अर्थव्यवस्थेची कांस धरली त्या पक्षाने सुधारणावादी दृष्टी स्वीकारणे कौतुकास्पद होते. पण त्यासाठी राव यांना जेवढे श्रेय मिळायला हवे होते तेवढे कधीच दिले गेले नाही. इतिहास त्यांचे पुनर्मुल्यांकन करेल याची मला खात्री आहे. पण त्या काळात वित्तमंत्री म्हणून डॉ. सिंग यांनी केलेली कामगिरी दीर्घकाळ स्मरणात राहील.