सक्षम भारतामुळे शेजारी राष्ट्रांनाच फायदा - पंतप्रधान मोदी
By Admin | Updated: June 16, 2014 15:14 IST2014-06-16T10:23:06+5:302014-06-16T15:14:38+5:30
भारताचा विकास होणे आवश्यक असून सक्षम भारताचा फायदा भूतान व सार्कमधील अन्य शेजारी राष्ट्रांनाच होईल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले आहे.

सक्षम भारतामुळे शेजारी राष्ट्रांनाच फायदा - पंतप्रधान मोदी
ऑनलाइन टीम
थिंपू, दि. १६- भारताचा विकास होणे आवश्यक असून सक्षम भारताचा फायदा भूतान व सार्कमधील अन्य शेजारी राष्ट्रांनाच होईल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले आहे. शेजारी राष्ट्रांसोबत चांगले संबंध निर्माण करण्यास भारत नेहमीच प्रयत्नशील असेल असेही मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या भूतान दौ-यावर असून सोमवारी या दौ-याचा शेवटचा दिवस आहे. सोमवारी सकाळी मोदींनी भूतानच्या संसदेत भाषण केले. यात मोदींनी भारत व शेजारी राष्ट्रांच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर जास्त जोर दिला. भूतानविषयी मोदी म्हणाले, भूतानने अवघ्या सात वर्षात सक्षम लोकशाही निर्माण केली. भूतानच्या जागरुक मतदारांचे कौतुकच करायला हवे.
पर्यावरण संवर्धन करत भूतान विकास करत असून विकासाऐवजी लोकांच्या आनंदावर भर देण्याची या देशाची वृत्ती वाखणण्याजोगी आहे असे मोदींनी सांगितले.
हिमालय पर्वतरांगा हा भारत आणि भूतानला मिळालेला वारसा असून या संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तसेच हिमालयाच्या अभ्यासाठी केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करु अशी घोषणाही त्यांनी केले. दहशतवाद लोकांना तोडतो पण पर्यटनामुळे लोकांना जोडता येते असा संदेशही त्यांनी दिला.
भूतानच्या अर्थसंकल्पात शिक्षणावर लक्षणीय खर्च केला जात आहे. भूतानमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दालन खुले करुन देण्यासाठी भारत भूतानमध्ये ई लायब्ररीचा प्रकल्प राबवेल अशी घोषणा त्यांनी केली. उर्जा क्षेत्रात हायड्रोपॉवर प्रकल्प राबवून भारत - भूतानने ग्लोबल वॉर्मिंगने ग्रासलेल्या जगभरातील देशांसमोर एक नवीन पायंडा घालून दिल्याचे मोदींनी सांगितले. भूतानमधील राजपरिवार, पंतप्रधान व सर्वसामान्यांनी दिलेल्या आदरसन्मानासाठी मोदींनी त्यांचे आभार मानले.