पंतप्रधानांनी राज्यसभेत दिली एमएसपीची हमी, आता राकेश टिकैत म्हणतात...
By बाळकृष्ण परब | Updated: February 8, 2021 13:54 IST2021-02-08T13:54:02+5:302021-02-08T13:54:30+5:30
Rakesh Tikait on MSP : नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना एमएसपीची हमी देत एमएसपी होती, आहे आणि कायम राहील, असे सांगितले होते. त्यावर आता भारतीय किसान युनियनचे सचिव राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधानांनी राज्यसभेत दिली एमएसपीची हमी, आता राकेश टिकैत म्हणतात...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना एमएसपीची हमी देत एमएसपी होती, आहे आणि कायम राहील, असे सांगितले होते. त्यावर आता भारतीय किसान युनियनचे सचिव राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राकेश टिकेत एमएसपीबाबत म्हणाले की, आम्ही कुठे म्हटले आहे की, एमएसपी संपुष्टात येणार आहे. आमची मागणी एमएसपीबाबत कायदा करावा अशी आहे. जर असा कायदा झाला तर संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या एमएसपीबाबत कुठलाही कायदा नाही आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे.
When did we say that MSP is ending? We said that a law be formed on MSP. If such a law is formed, all the farmers of the country will be benefitted. Right now, there is no law on MSP and the farmers are looted by traders: Rakesh Tikait, Bharatiya Kisan Union pic.twitter.com/xZDhUzH3nV
— ANI (@ANI) February 8, 2021
दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावला, त्याचसोबत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चर्चेसाठी पुढे येण्याचं आवाहन केले आहे, आंदोलन करणं योग्य नाही, शेतकऱ्यांनी पुढे येऊन चर्चा करावी, कृषिमंत्र्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेतच, पण वयोवृद्ध लोकांना घेऊन आंदोलनात बसणं योग्य नाही. देशाला पुढे घेऊन जायचं आहे, सगळ्यांनी सोबत यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना केलं आहे.
तसेच एकदा सुधारणा करून लाभ होतोय का नाही हे पाहायला हवं, त्रुटी असेल ती दुरुस्त करूया.. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल त्याचसोबत एमएसपी आहे, राहील आणि यापुढे राहणार आहे, त्यामुळे भ्रम पसरवू नका, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दुसऱ्या पर्यायावर भर देणं गरजेचे आहे. शेतकऱ्यांवरील बोझा कमी व्हावा यासाठी विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आपणास आणखी काम करायचं आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये असं नरेंद्र मोदींनी सांगितले.