आत्महत्येमुळे संसद हळहळली
By Admin | Updated: April 24, 2015 02:24 IST2015-04-23T23:42:35+5:302015-04-24T02:24:29+5:30
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा सुरू असताना शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे संसदेने गुरुवारी तीव्र दु:ख आणि संताप व्यक्त केला.

आत्महत्येमुळे संसद हळहळली
नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा सुरू असताना शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे संसदेने गुरुवारी तीव्र दु:ख आणि संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार शेतकऱ्यांना मरू देणार नाही, अशी ग्वाही देत विरोधकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. हा अतिशय खोलवर रुजलेला आणि व्यापक असा प्रश्न असून तो सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
सभागृहात दोन तास चाललेल्या चर्चेत राजस्थानमधील शेतकरी गजेंद्रसिंग याने दिल्लीत झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याबद्दल सर्वच सदस्यांनी राजकीय भेद बाजूला सारत भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.
राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सीबीआय चौकशीची मागणी लावून धरतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याखेरीज अन्य कुणाचे निवेदन चालणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. तत्पूर्वी शून्य तासाला मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, गजेंद्रसिंग याच्या आत्महत्येसाठी केंद्र आणि दिल्ली सरकार जबाबदार आहे. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले असल्याने सभागृहाचे कामकाज थांबवून चर्चा करायला हवी. लोकसभेत गदारोळ
लोकसभेत कामकाज सुरू होताच जोरदार नारेबाजी करीत विरोधी पक्षांनी या मुद्यावर चर्चेची मागणी केली. सरकारने नंतर ती मान्यही केली; मात्र गदारोळातच काही मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. काँग्रेसच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास निलंबित ठेवण्याची मागणी केली; मात्र अध्यक्षांनी ती फेटाळली. काँग्रेसच्या सदस्यांनी ‘किसानविरोधी सरकार नही चलेगी’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. (लोकमत न्यूज नेटवर्क)