Narendra Modi in Jammu Kashmir: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आई वैष्णो देवीच्या आशीर्वादाने आज काश्मीर खोरे देशाच्या रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत...असे नेहमीच म्हटले जायचे. पण, आता या रेल्वे नेटवर्कमुळे हे सत्यात उतरले आहे. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत पाकिस्तानवर दंगली घडवण्याचा आरोप केला.
पाकिस्तानचा हेतू दंगली घडवणे...पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, जम्मू आणि काश्मीर हा भारतमातेचा मुकुट आहे. हा मुकुट एकामागून एक सुंदर रत्नांनी जडलेला आहे. ही वेगवेगळी रत्ने जम्मू आणि काश्मीरची ताकद आहेत. येथील प्राचीन संस्कृती, येथील परंपरा, येथील आध्यात्मिक चेतना, निसर्गाचे सौंदर्य, येथील औषधी वनस्पती ही येथील रत्ने आहेत. पाकिस्तानने याच भूमितील पहलगाममध्ये मानवता आणि काश्मिरीयत या दोन्हींवर हल्ला केला. त्यांचा हेतू भारतात दंगली घडवणे, काश्मीरमधील कष्टकरी लोकांची कमाई थांबवणे होता.
पाकिस्तानचा लज्जास्पद पराभव कायम लक्षात राहीलआपला शेजारी देश मानवतेच्या विरोधात आहे. पण, जम्मू-काश्मीरमधील तरुणांनी आता दहशतवादाला योग्य उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज ६ जून आहे. योगायोगाने एक महिन्यापूर्वी याच रात्री पाकिस्तानवर कारवाई करण्यात आली होती. आता जेव्हा जेव्हा पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकेल, तेव्हा त्यांना त्यांचा लज्जास्पद पराभव आठवेल, अशी प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली.
चिनाब नदीवरील पुलाचे उद्घाटनपंतप्रधान मोदी या चिनाब पुलाच्या उद्घाटनाबाबत म्हणाले, आजचा कार्यक्रम भारताच्या एकतेचा आणि भारताच्या इच्छाशक्तीचा एक उत्सव आहे. आमच्या सरकारचे भाग्य आहे की, आमच्या कार्यकाळात या प्रकल्पाला गती मिळाली आणि आम्ही ते पूर्ण केले. प्रवासात अडचणी, हवामानाच्या समस्या, डोंगरावरून सतत दरडी कोसळणे...अशा विविध समस्या आल्या. हा प्रकल्प पूर्ण करणे आव्हानात्मक होते, परंतु आमच्या सरकारने आव्हानालाच आव्हान दिले.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग जम्मू-काश्मीरच्या नवीन ताकदीची ओळख आहेत. चिनाब पूल असो किंवा अंजी पूल... हे जम्मू-काश्मीरसाठी समृद्धीचे साधन बनतील. या सुरुवातीमुळे केवळ पर्यटन वाढणार नाही, तर अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांनाही फायदा होईल. जम्मू-काश्मीरच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे दोन्ही प्रदेशातील व्यावसायिकांसाठी नवीन संधी निर्माण होतील, उद्योगाला गती मिळेल. पंतप्रधान मोदींनी आज जम्मू-काश्मीरमधील कटरा आणि श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. ही काश्मीर खोरे आणि जम्मू प्रदेशातील पहिली रेल्वे सेवा आहे. यासोबतच ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांच्या पायाभरणी, उद्घाटन केले.
मोदींच्या दौऱ्यापूर्वी संशयितांच्या घरांवर छापेपंतप्रधान मोदींच्या दौऱ्यमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस, निमलष्करी दल, सैन्य आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. घटनास्थळांभोवती मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे परिसरात लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी खोऱ्यातील संशयितांच्या घरांवर छापे अधिक तीव्र करण्यात आले, ज्यात ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW) आणि सीमेपलीकडून सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी व्यवस्थेचा आढावा घेतला होता.
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी