पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, तीन नागरिक ठार
By Admin | Updated: August 15, 2015 20:34 IST2015-08-15T18:46:45+5:302015-08-15T20:34:17+5:30
देशभरात आज स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना पाकिस्तानच्या कुरापती मात्र आजही सुरू असून सलग सातव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, तीन नागरिक ठार
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. १५ - देशभरात आज स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना पाकिस्तानच्या कुरापती मात्र आजही सुरू असून सलग सातव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात तीन नागरिक ठार झाले आहेत तर एका लहान मुलासह सात जखमी झाले आहेत. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदी व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिलेल्या असतानाच दुसरीकडे पाकिस्तानी जवानांच्या गोळीबारामुळे दोन्ही देशांतील वातावरण पुन्हा तणावपूर्ण बनले आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने पूंछमधील मंडी, हमीरपूर व सोजियान सेक्टरमधील चौक्यांवर तसेच येथील रहिवासी भागातही जोरदार गोळीबार केला. काल संध्याकाळपासून हा हल्ला सुरू असून यामध्ये तीन नागरिकांसह सात जण जखमी झाले आहेत.
या वर्षात २६ जुलैपर्यंत पाकिस्तानने तब्बल १९२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केल्याची माहिती सरकारतर्फे नुकतीच देण्यात आली होती.