पाकच्या दहशतवादी नौकेची स्फोटात राख !
By Admin | Updated: January 3, 2015 02:59 IST2015-01-03T02:59:37+5:302015-01-03T02:59:37+5:30
नव्या वर्षात भारतात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानी कट सतर्क तटरक्षक दलाने तासाभराच्या थरारक मोहिमेअंती अरबी समुद्रात बुडविला.

पाकच्या दहशतवादी नौकेची स्फोटात राख !
२६/११ सारखा हल्ला टळला : तटरक्षकच्या पाठलागानंतर आत्मघात
नवी दिल्ली : नव्या वर्षात भारतात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानी कट सतर्क तटरक्षक दलाने तासाभराच्या थरारक मोहिमेअंती अरबी समुद्रात बुडविला. ३१ डिसेंबरच्या उत्तररात्री शक्तिशाली स्फोटके घेऊन भारतीय सागरी हद्दीत शिरणाऱ्या संशयित पाकिस्तानी नौकेला भारतीय तटरक्षक दलाने भरसमुद्रात घेरले. गुजरातेतील पोरबंदरच्या नैऋत्येला ३६५ कि.मी. अंतरावर खोल समुद्रात संशयास्पद हालचाली करणाऱ्या पाकिस्तानी बोटीचा तटरक्षक दलाने मिट्ट काळोखात यशस्वी पाठलाग केला. आता सुटका नाही, याची जाणीव होताच त्या बोटीतील चौघांनी बोटीलाच आग लावून ती स्फोटात भस्मसात केली. त्यानंतर बोटीसह त्या चार जणांनाही जलसमाधी मिळाली.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर देश नववर्षाच्या जल्लोषात मग्न असताना तटरक्षक दल डोळ््यांत तेल घालून सागरी सरहद्दीच्या रक्षणार्थ सज्ज होते. कराचीच्या केती बंदरातून निघालेल्या या पाकिस्तानी मच्छिमारी नौकेच्या हालचाली व हेतूंबाबतचा संशय लष्कराच्या गुप्तचरांनी व्यक्त केल्यानंतर भर समुद्रातील थरारनाट्याचा पहिला अंक रातोरात सुरू झाला. २६/११ च्या मुंबई हल्ल्यासाठी अजमल आमिर कसाब आणि त्याचे सहकारी कराचीहून समुद्रमार्गेच भारतात घुसले होते. त्याचीच तर ही पुनरावृत्ती नव्हे? अशी पाल चुकचुकताच तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान अंधार कापत आकाशात झेपावले.
भारतीय हद्दीत शिरलेल्या या बोटीचा नेमका मागोवा या विमानाने घेताच तटरक्षक गस्ती नौकांचे काम सुरू झाले. वारंवार इशारा दिल्यानंतरही थांबण्याऐवजी भारतीय हद्दीच्या बाहेर जाण्यासाठी या बोटीच्या खलाशांनी वेग कमालीचा वाढविला. तटरक्षक नौकांनी तब्बल तासभर या बोटीचा थरारक पाठलाग केला. अखेर ही मच्छिमारी नौका पुरती टप्प्यात येताच इशाऱ्यादाखल भारतीय जवानांनी गोळीबारही केला. तेव्हा डेकखाली
आश्रय घेणाऱ्या चौघा खलाशांनी बोटीलाच आग लावून दिली. आगीत या
चौघांसह शक्तिशाली स्फोटकेही भस्मसात झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
घटनाक्रम
संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार या मच्छिमारी नौकेत अंधार होता व स्फोटके लपविण्यात आली होती.
कराची जवळून ही बोट आल्याचे व अरबी समुद्रात ती गैरव्यवहार करणार असल्याचा गुप्तचर सूत्रांचा अहवाल होता.
संशयास्पद बोटीवर निगराणी ठेवण्यासाठी मध्यरात्री मोहीम आखण्यात आली
पोरबंदरपासून ३६५ कि.मी. अंतरावर तटरक्षक दलाने बोटीला घेरले.
पाकिस्तानी बोटीला थांबण्याचा इशारा देण्यात आला, पण या बोटीने वेग वाढवून पळण्याचा प्रयत्न केला.
तासभर पाठलाग केल्यानंतर इशारा देण्यासाठी गोळीबार केल्यामुळे बोट थांबली
बोटीवरील खलाशांनी बोटीला आग लावून दिली. त्यानंतर स्फोट झाला व बोट खलाशांसह बुडाली.
अंधार व वादळी हवेमुळे बोट वा खलाशी याना वाचवता आले नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा या महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने संपूर्ण देशात हाय अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
२६-११ च्या मुंबईवरील हल्ल्यात कराचीहून १० पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत आले होते. त्यानी नंतर दोघा दोघांच्या जोडया केल्या व मुंबईतील सर्व प्रमुख स्थळावर हल्ले केले. या हल्ल्यात १६६ लोक मरण पावले होते.
अटक व चौकशीअंती पाकच्या अंगलट येणारा विषय टाळण्यासाठीच पाक खलाशांनी मुद्देमालाला आग लावून नौकाच बुडविली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. केती बंदरातून निघालेली ही बोट अरबी समुद्रात गडबड करण्याच्या बेतात होती, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले.
दोन महिन्यांपासून किनारपट्टी भागात गस्त
गुप्तचर खात्याने दिलेल्या अचूक माहितीनुसार ही मध्यरात्रीची मोहीम राबविण्यात आली असे तटरक्षक दलाचे महानिरीक्षक के आर नौटियाल यानी म्हटले आहे.
अंधार, वादळी हवा व जोरदार वारे यामुळे बोट व त्यावरील खलाशी यांना वाचवता आले नाही. बोटीला आग लागली व जळालेली बोट तशीच पाण्याखाली गेली.
तटरक्षक दलाच्या नौका व विमाने या भागात गस्त घालत असून या बोटीवरील कोणी बचावले आहे काय याचा शोध घेतला जात आहे. तटरक्षक दल व
सुरक्षा दले गेल्या दोन महिन्यांपासून किनारपट्टीच्या भागात गस्त घालत आहेत.
सागरी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आल्यामुळे ही खबरदारी घेतली जात आहे. किंबहुना या सतर्कतेतूनच संभाव्य भीषण दहशतवादी हल्ला टाळण्याची कामगिरी तटरक्षक दलाने फत्ते केली.