दोन महिन्यांपूर्वी २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांची धार्मिक ओळख पटवून त्यांची हत्या केली होती. या हल्ल्यात एकूण २६ पर्यटक मारले गेले होते. त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले होते. मात्र पहलगाममध्ये हल्ला करणारे चार दहशतवादी मात्र सुरक्षा दलांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे सुरक्षा दलांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एनआयएच्या हाती मोठं यश लागलं असून, पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएने रविवारी दोन जणांना अटक केली आहे. या दोघांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आणि हल्ल्यापूर्वी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे.
अटक करण्यात आलेले दोघेही काश्मिरी असून, त्यांची ओळख पहलगाममधील बटकोट येथील रहिवासी परवेझ अहमद जोथर आणि हिल पार्क येथील रहिवासी बशीर अहमद जोथर अशी पटली आहे. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर यांनी पहलगाममधील हिल पार्क येथे असलेल्या झोपडीमध्ये लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक आश्रय दिला होता, असे असे या हल्ल्याचा तपास करत असलेल्या एनआयच्या तपासामधून समोर आहे होते. या दोघांनीही दहशतवाद्यांना जेवण, आश्रय आणि रसद पुरवली होती. एवढंच नाही तर सुरक्षा दलांची दिशाभूल करण्यासाठी त्यांची ओळखही लपवली होती.
एनआयएने या दोघांविरोधात बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा, १९६७ (यूएपीए)च्या कलम १९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणी आणखीही अटकेच्या कारवाया होऊ शकतात, असे संकेत एनआयएने दिले आहेत.