Shikhar Dhawan on Shahid Afridi: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर येत आहे. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हे मान्य करायला तयार नाही. शाहिद आफ्रिदीने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे भारताकडून मागितले होते. तसेच या हल्ल्यासाठी भारतीय सैन्यालाही जबाबदार धरलं. यावरुनच भारतीय क्रिकेकटपटू शिखर धवनने आफ्रिदीला सुनावलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या विधानामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. भारतीय सैन्यावर अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या शाहिद आफ्रिदीला शिखर धवनने चोख प्रत्युत्तर दिले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटूने सोशल मीडियावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर टीका केली. तुम्ही अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहात असं शिखर धवनने म्हटलं आहे.
"तुम्हाला कारगिलमध्ये सुद्धा हरवलं होतं. आधीच तुम्ही इतके खालच्या पातळीवर गेला आहात, आणखी किती खाली जाल? अनावश्यक टिप्पण्या करण्याऐवजी, तुमच्या देशाच्या प्रगतीसाठी डोकं लावा. शाहिद आफ्रिदी आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद!," असं शिखर धवन याने म्हटलं आहे.