आपली संस्कृती सर्वांना सामावून घेणारी

By Admin | Updated: November 8, 2015 03:17 IST2015-11-08T03:17:17+5:302015-11-08T03:17:17+5:30

देशातील वाढत्या असहिष्णुतेवरून सुरू असलेले वादळ आणि त्यानिषेधार्थ अनेक लेखक-कलावंतांनी ‘पुरस्कार वापसी’चे अस्त्र उगारले असताना, भारतीय संस्कृती सहिष्णुतेच्याही

Our culture is encompassing everyone | आपली संस्कृती सर्वांना सामावून घेणारी

आपली संस्कृती सर्वांना सामावून घेणारी

नवी दिल्ली : देशातील वाढत्या असहिष्णुतेवरून सुरू असलेले वादळ आणि त्यानिषेधार्थ अनेक लेखक-कलावंतांनी ‘पुरस्कार वापसी’चे अस्त्र उगारले असताना, भारतीय संस्कृती सहिष्णुतेच्याही पुढे जाऊन सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेणारी आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली ५१ कलावंत व लेखकांच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली, तेव्हा मोदी यांनी वरील मत व्यक्त केले. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून काही लोकांनी सुरू केलेल्या निषेध आंदोलनाविषयी शिष्टमंडळाने चिंता व्यक्त केली व हा या लोकांचा राजकीय अ‍ॅजेंडा असल्याचा आरोप केला.

दिल्लीत काढला ‘मार्च फॉर इंडिया’
अनुपम खेर यांच्या नेतृत्वात शनिवारी राष्ट्रपती भवनवर ‘मार्च फॉर इंडिया’ काढण्यात आला आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्या शक्तींविरुद्ध एक निवेदन त्यांना देण्यात आले.
पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त प्रख्यात नर्तक बिरजू महाराज, प्रसिद्ध लेखक नरेंद्र कोहली, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर, अशोक पंडित, प्रियदर्शन, मनोज जोशी, गायक अभिजित भट्टाचार्य, मालिनी अवस्थी, राजा बुंदेला आणि लेखिका मधू किश्वर यांच्यासह अनेक चित्रपट निर्माते व कलाकार राष्ट्रीय संग्रहालयापासून निघालेल्या या मार्चमध्ये सहभागी झाले होते.
भारत सहिष्णू आहे. परंतु काही लोकांनी असहिष्णुतेच्या नावावर वाद निर्माण केला आहे. पुरस्कार वापसीच्या मोहिमेद्वारे चुकीचे चित्र निर्माण करून देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खेर यांनी यावेळी केला.

Web Title: Our culture is encompassing everyone