Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारेपाकिस्तानला त्यांच्याच शब्दात धडा शिकवला. या ऑपरेशनमध्ये भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. संरक्षण मंत्री आज नौदलाचे लढाऊ जहाज आयएनएस विक्रांतवर गेले होते. यावेळी त्यांनी नौदल अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि नौदलाबद्दल महत्त्वाची माहिती दिली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. जर पाकिस्तानने काही चूक केली तर यावेळी त्याला सावरण्याची संधीही मिळणार नाही. आमचे नौदल त्सुनामी आणू शकते. पाकिस्तानला असे उत्तर देऊ की, त्याने कधी विचारही केला नसेल. पाकिस्तान वारंवार चर्चेचा प्रस्ताव देत आहे. कालच पाकिस्तानी पंतप्रधान चर्चेबद्दल बोलले. पण, आमची स्पष्ट भूमिका आहे की, यापुढे फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा होणार.
पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते...राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, पाकिस्तानने हाफिज सईद आणि मसूद अझहरला भारताच्या स्वाधीन करावे. हाफिज सईद मुंबई हल्ल्यात सहभागी होता आणि त्याला जबाबदार धरले जाईल. दहशतवादाविरुद्ध आम्ही अशी कारवाई करू, ज्याचा पाकिस्तान विचारही करू शकत नाही. यावेळी जर पाकिस्तानने पुन्हा काही आपल्या कुरापती सुरू केल्या, तर नौदल देखील युद्धात उतरेल अन् मग पाकिस्तानचे काय होईल, हे देवालाच माहिती. 1971 मध्ये जेव्हा नौदल आले होते, तेव्हा पाकिस्तानचे 2 तुकडे झाले होते. आता ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल आले असते, तर पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते, असा मोठा दावाही त्यांनी यावेळी केला.
पाकिस्तानला भारतीय नौदलाची ताकद ठाऊक आहेसंरक्षणमंत्री पुढे म्हणाले, भारतीय नौदलाने कारवाई केल्याने काय परिणाम होतात, हे पाकिस्तानला चांगलेच ठाऊक आहे. भारत कुठेही कधीही अन् कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आपल्या सैन्याचे मनोबल डोंगरासारखे मजबूत आहे. आपली बाजून इतकी मजबूत आहे की, पाकिस्तान संपूर्ण जगासमोर विनवणी करत आहे, असेही राजनाथ सिंहा यावेळी म्हणाले.