ऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्ताननेगुजरातवर मिसाईल्स आणि ड्रोन डागले. पण प्रत्येक हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. बीएसएफ गुजरात फ्रंटियरचे महानिरीक्षक अभिषेक पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने सीमेवर टँक तैनात केले आहेत. पुढच्या वेळी आणखी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व गोष्टींचं विश्लेषण केलं जात आहे.
"पाकिस्तानने गुजरातवर ६०० ड्रोन डागले"
राजस्थानमधील बारमेर ते गुजरातच्या कच्छ जिल्ह्यापर्यंत बीएसएफ भारत-पाकिस्तान सीमेचं रक्षण करत आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान बीएसएफच्या भूमिकेबद्दल गांधीनगरमध्ये पत्रकार परिषदेत पाठक म्हणाले की, "राजस्थान ते कच्छपर्यंत आपल्या सीमेवर पाकिस्तानने पाठवलेल्या जवळपास ६०० ड्रोनपैकी सुमारे ४० टक्के (२०० ड्रोन) गुजरातमध्ये घुसले. आम्ही लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या मदतीने हल्ले हाणून पाडले. सैन्याचं किंवा सामान्य जनतेचं कोणतंही नुकसान झालं नाही. काही ड्रोन पाडण्यात आले."
दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त
भारताने पीओकेमध्ये प्रवेश करून ऑपरेशन सिंदूर केलं. या ऑपरेशनमध्ये १६० हून अधिक लोक मारले गेले, ज्यात दहशतवादी, त्यांचे सहकारी आणि पाकिस्तानी लष्करी कर्मचारी यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
मसूद अझहरच्या नातेवाईकांचा खात्मा
ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचं महत्त्वाचं ठिकाण असलेल्या बहावलपूरमधील २० हून अधिक लोक मारले गेले. बहावलपूरमध्ये मारले गेलेले बरेच जण जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे नातेवाईक असल्याचं सांगितलं जातं. पाकिस्तानी सैन्याचंही मोठं नुकसान झालं आहे. मात्र पाकिस्तानने अधिकृतपणे फक्त ११ जणांचा मृत्यू आणि ७८ जण जखमी झाल्याची कबुली दिली आहे.