‘अब की बार, भाजप नहीं ३०० के पार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:18 AM2019-05-21T06:18:47+5:302019-05-21T06:19:00+5:30

विरोधकांचा दावा : आज दिल्लीत भेटणार

'Now times, BJP not cross 300' | ‘अब की बार, भाजप नहीं ३०० के पार’

‘अब की बार, भाजप नहीं ३०० के पार’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘अब की बार, ३०० के पार' हा भाजपने केलेला दावा खरा होण्याची शक्यता असल्याचे बहुतांश एक्झिट पोलनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण असले, तरी एक्झिट पोलचे निष्कर्ष चुकीचे असल्याचा दावा ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, शशी थरुर आदी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. त्यातच एक्झिट पोलचे निकाल अनेकदा चुकले असून, ते एक्झॅक्ट पोल नव्हेत, असे खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहेत.


आंध्र प्रदेश, ओडिशा, तसेच सिक्किम व अरुणाचल प्रदेश विधानसभेत आहेत तेच पक्ष पुन्हा सत्तेवर येतील, असे काही एक्झिट पोल्सनी म्हटले आहे. त्यामुळे आंध्रात चंद्राबाबू नायडू, ओडिशात नवीन पटनायक, सिक्किममध्ये एसडीएफचे पवनकुमार चामलिंग व अरुणाचलमध्ये भाजपचे पेमा खांडू हेच मुख्यमंत्री बनू शकतील. अर्थात, काही एक्झिट पोल्सनी आंध्रात जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविली आहे.
पुढील रणनीती ठरविण्यासाठी भाजपप्रणित रालोआमध्ये नसलेल्या काही पक्षांचे नेते उद्या, मंगळवारी दिल्लीत भेटणार आहेत. त्याची तयारी चंद्राबाबू नायडू संबंधित नेत्यांना भेटून करीत आहेत. अखिलेश यादव यांनी आज मायावती यांची भेट घेतली, तर चंद्राबाबूंनी ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. चंद्राबाबू म्हणाले की, लोकांची नाडी ओळखण्यात एक्झिट पोल अपयशी ठरले आहेत. आंध्रात पुन्हा तेलगू देसमचेच सरकार, तर केंद्रामध्ये बिगरभाजप पक्षांचे सरकार स्थापन होईल.


काँग्रेसचे नेते शशी थरुर म्हणाले की, आॅस्ट्रेलियातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तर ५६ एक्झिट पोल चुकीचे ठरले. पोल घेणारे लोक सरकारी कर्मचारी असावेत, अशी समजूत झाल्याने लोक आपल्या मनातला खरा विचार त्यांना सांगत नाहीत. पिनराई विजयन, एच. डी. कुमारस्वामी, स्टॅलिन, आपचे नेते संजय सिंह, पंजाबचे अमरिंदर सिंह यांनीही एक्झिट पोलवर टीका केली आहे.


ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एक्झिट पोल घेणाऱ्या लोकांना वश करून घेता येते. त्यामुळे या पोलच्या निष्कर्षांवर माझा काडीमात्र विश्वास नाही. ओमर अब्दुल्ला म्हणाले आहे की, सर्वच एक्झिट पोल चुकीचे आहेत, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे टीव्ही बंद करा, सोशल मीडियापासून दूर राहा आणि २३ मे रोजी निकालाची वाट पाहा.


आव्हान आणि प्रतिआव्हान

या एक्झिट पोलनंतर लगेचच भाजपने मध्य प्रदेश विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मुख्यमंत्री कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी विनंती राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना केली. त्यावर आपण बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत, असे प्रतिआव्हान कमलनाथ यांनी भाजपला दिले.
1लोकसभेच्या एक्झिट पोलमुळे कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमधील काँग्रेस नेते धास्तावले आहेत.
2केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, एच. डी. कुमारस्वामी, एम. के. स्टॅलिन, आपचे नेते संजय सिंह, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीही एक्झिट पोलच्या निष्कर्षांवर टीका केली आहे.

Web Title: 'Now times, BJP not cross 300'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.