पाकिस्तानभारताला वारंवार अणुबॉम्बची धमकी देत असतो. मात्र आता अशी धमकी देण्यापूर्वी तो शंभर वेळा विचार करेल. कारण भारताच्या अण्वस्त्र साठ्यात आता मोठी वाढ झाली आहे. या वर्षी भारताच्या अण्वस्त्रांची संख्या १८० वर पोहोचली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या नवीन अहवाला दावा करण्यात आला आहे की, अण्वस्त्रांच्या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा आघाडीवर आहे आणि तो हळूहळू अण्वस्त्रे वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांची संख्या देखील वाढवत आहे.
SIPRI च्या अहवालानुसार, भारत अण्वस्त्रांची संख्या झपाट्याने वाढवत आहे आणि या वर्षी भारताच्या अण्वस्त्रांची संख्या १८० वर पोहोचली आहे, तर गेल्या वर्षीपर्यंत त्याच्याकडे १७२ अण्वस्त्रे होती. गेल्या वर्षी SIPRI चा अहवाल आला होता, त्यात पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे असल्याचा दावा करण्यात आला होता.
या अहवालात म्हणण्यात आले आहे की, भारताचे नवीन 'कॅनिस्टराइज्ड' क्षेपणास्त्रे अत्यंत सुरक्षित आहेत. या क्षेपणास्त्रां मध्ये आधीच लोड केले जाऊ शकतात. भविष्यात, ही नवीन पिढीची क्षेपणास्त्रे एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम ठरू शकतात.
संबंधित अहवालानुसार, भारत एक नवी न्यूक्लिअर सिस्टिम डेव्हलप करत आहे आणि त्याच्या नव्या कॅनिस्टराइज्ड क्षेपणास्त्रावर ते एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, अनेक वॉरहेड लावले जाऊ शकतात.
भारताच्या नवीन पिढीतील क्षेपणास्त्र प्रणालींमध्ये अग्नि प्राइम (अग्नि-पी) आणि मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) सक्षम अग्नि-५ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या मते, अग्नि-पी हे अग्नि मालिकेतील क्षेपणास्त्रांचे सर्वात प्रगत व्हेरिअंट आहे. हे एक कॅनिस्टराइज्ड क्षेपणास्त्र आहे, ज्याची रेंज १००० ते २००० किलोमीटर आहे. गेल्या वर्षी भारताने एमआयआरव्ही सक्षम अग्नि-५ ची यशस्वी चाचणी केली. हे ५,००० किलोमीटर अंतरावरूनही लक्ष्यांवर अचूक मारा करू शकते.