ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतर, आता भारताने आपली लष्करी ताकद आणखी वाढविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत, आता भारत पुढील चार वर्षांत अर्थात २०२९ पर्यंत ५२ विशेष संरक्षण उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. हे सर्व उपग्रह चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या सीमेवर लक्ष ठेवतील. हे सर्व उपग्रह आर्टिफिशियल इंटॅलिजन्स (AI) बेस्ड असतील.
गेल्या वर्षीही देण्यात आली होती कोट्यवधींची मंजुरी -ही संपूर्ण मोहीम संरक्षण अंतराळ संस्थेअंतर्गत चालवली जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा व्यवहारांसंदर्भातील मंत्रिमंडळ समितीने यासाठी २६,९६८ कोटी रुपये मंजूर केले होते. या योजनेंतर्गत, इस्रो २१ उपग्रह तयार करून प्रक्षेपित करणार आहे, तर तीन भारतीय खाजगी कंपन्या ३१ उपग्रह तयार करतील.
पहिला उपग्रह एप्रिल २०२६ मध्ये प्रक्षेपित केला जाईल -हे उपग्रह लो-अर्थ ऑर्बिट आणि जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये तैनात केले जातील. पहिला उपग्रह एप्रिल २०२६ मध्ये प्रक्षेपित केला जाईल. मात्र, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा कालावधी आणखी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेस-बेस्ड सर्व्हिलान्सच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (SBS-3) हे सर्व सुरू आहे.
चीन-पाकिस्तान सीमेवर लक्ष ठेवेल... हिंदी महासागरही येईल टप्प्यात - एसबीएस-3 चा मुख्य उद्देश चीन आणि पाकिस्तानच्या अधिकांश भागांवर लक्ष ठेवणे असा आहे. याने हिंदी महासागरावरही लक्ष ठेवले जाईल. हे सर्व उपग्रह अंतराळात भारताचे डोळे म्हणून कार्यरत राहतील. तसेच मेसेज आणि फोटो पाठवत राहतील. यामुळे भारताची सुरक्षितता आणखी बळकट होईल.