नवी दिल्ली : भारताकडे उत्तम कुशल मनुष्यबळ असले तरी त्याच्या उत्पादन क्षेत्राचा पाया भरभक्कम असणे आवश्यक आहे. देशातील युवकांना नवीन तंत्रज्ञानविषयक क्षेत्रांत नोकऱ्या उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्यासाठी पोकळ वक्तव्ये नव्हे तर सुस्पष्ट धोरणाची आवश्यकता आहे, असा टोला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्राला लगावला.
राहुल गांधी यांनी ड्रोन तंत्रज्ञानावरील व्हिडीओ ‘एक्स’वर प्रसारित केला. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, भारताकडे भविष्यात अशा तंत्रज्ञानाचा विकास करण्याची क्षमता आहे. चीनने ड्रोन उत्पादन करण्यास सुरुवात केली. यात पुढे जाण्यासाठी भारतानेही आता जोमाने प्रयत्न करावेत.
विमानांचे महत्त्व कमी झाले
राहुल गांधी यांनी सांगितले की, ड्रोनने तोफा, लढाऊ विमाने यांचे युद्धातील महत्त्व कमी केले आहे. ही क्रांती संरक्षण क्षेत्रापुरती मर्यादित नाही.
ड्रोनचे उत्पादन करणे हे महत्त्वाचे आहेच; पण त्यासाठी इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी, ऑप्टिक्स व अन्य आवश्यक वस्तूंच्या उत्पादनावर आपला वरचष्मा राखणे याला अधिक महत्व आहे.