ईशान्येकडील राज्यांना ‘हाय अलर्ट’
By Admin | Updated: June 11, 2015 23:51 IST2015-06-11T23:51:43+5:302015-06-11T23:51:43+5:30
म्यानमारमधील लष्करी कारवाईचा सूड उगविण्यासाठी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड(खापलांग) या दहशतवादी संघटनेने मोठ्या

ईशान्येकडील राज्यांना ‘हाय अलर्ट’
नवी दिल्ली : म्यानमारमधील लष्करी कारवाईचा सूड उगविण्यासाठी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड(खापलांग) या दहशतवादी संघटनेने मोठ्या हल्ल्याची योजना आखली असून काही बंडखोर म्यानमारमधून भारताच्या हद्दीत घुसले असल्याची गोपनीय माहिती आहे.
या माहितीच्या आधारे ईशान्येकडील सर्व राज्यांना अतिसतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. एनएससीएन(के),पीएलए, उल्फा आणि नव्याने स्थापित युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट आॅफ साऊथ आशियासह इतर गटांचे सुमारे २० बंडखोर भारतीय हद्दीत शिरले असून मोठा हल्ला घडविण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. परंतु त्यांची ही योजना हाणून पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,अशी माहिती केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या मुद्यावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि लष्कर प्रमुख दलबीरसिंग सुहाग उपस्थित होते.
बंडखोर कुठल्याही राष्ट्रीय संपत्तीला अथवा नागरिकांना लक्ष्य करू शकतात. सीमेवरील मोेरह गावात बुधवारी झालेला स्फोटही या योजनेचा भाग आहे,असे या अधिकाऱ्याने सांगितले. बैठकीत बंडखोरांच्या तळावर आणखी हल्ल्याची गरजही व्यक्त करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)