यापुढे युतीचे सरकार नकोच!
By Admin | Updated: October 6, 2014 04:45 IST2014-10-06T04:45:55+5:302014-10-06T04:45:55+5:30
महाराष्ट्रापुढील समस्यांचे कारण युती-आघाड्यांचे सरकार हेच असून, युतीच्या चक्रातून राज्याला सोडवा आणि भाजपला पूर्ण बहुमत द्या,

यापुढे युतीचे सरकार नकोच!
सांगली/कोल्हापूर : महाराष्ट्रापुढील समस्यांचे कारण युती-आघाड्यांचे सरकार हेच असून, युतीच्या चक्रातून राज्याला सोडवा आणि भाजपला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन करत बाळासाहेब ठाकरेंप्रती आदर आणि श्रद्धा असल्यानेच त्यांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेनेवर काहीही बोलणार नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. शरद पवारांनी आमच्या शिवभक्तीवर शंका घेऊ नये, त्यांच्यात शिवरायांचे गुण येणे अशक्य आहे, असा हल्लाही मोदी यांनी चढवला.
तासगाव (जि. सांगली) आणि कोल्हपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. बाळासाहेबांनी अनेक अडचणीवर मात करत शिवसेना वाढवली. त्यांच्याबद्दल आदर असल्यानेच शिवसेनेवर काहीही न बोलणे हे माझे कर्तव्य आहे, असे सांगत मोदींनी महायुती तुटल्यानंतर शिवसेनेकडे जाणारी सहानुभूती वळवण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या तासगावात मोदींनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांच्या घड्याळातील काटे हललेले नाहीत, हे महाराष्ट्राचे भविष्य कसे ठरवणार? पवारांना इतिहासाचे ज्ञान नाही. मुंबईच्या विमानतळाला आणि व्हिक्टोरिया टर्मिनसला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वाजपेयी सरकारनेच दिले आहे. आम्ही सुरतमध्ये बारामतीपेक्षा मोठा शिवरायांचा पुतळा उभा केला आहे. त्यामुळे पवारांनी आमच्या शिवभक्तीवर शंका घेऊ नये. ते अनेक वर्षे मुख्यमंत्री होते, नंतर केंद्रीय कृषीमंत्री होते. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन पवारांनी जलसंवर्धन केले असते, तर शेतकऱ्यांवर आत्महत्यांची वेळ आली नसती. साखर कारखान्यांना त्यांनी राजकारणाचा अड्डा बनवला आहे.
गुजरात हा आजही महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे. महाराष्ट्राला नर्मदा प्रकल्पातून चारशे कोटीची वीज गुजरात देणार आहे. शीतपेयांमध्ये केवळ पाच टक्के फळांचा रस घातला, तरी भारतातील फळ उत्पादकांना मोठा फायदा होईल. तशी विनंती अमेरिकेतील शीतपेय कंपन्यांना केली आहे. प्रयोगशाळेत त्यावर संशोधन करण्याची ग्वाही त्या कंपन्यांनी दिली आहे. जपानने भारतात दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्याला स्थिरता आणि गती देण्यासाठी भाजपला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहनही मोदी यांनी केले.