विमान अपघातातून नेताजी बचावले होते !
By Admin | Updated: April 1, 2016 00:53 IST2016-04-01T00:53:34+5:302016-04-01T00:53:34+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस हे १८ आॅगस्ट १९४५ मध्ये तायवान येथे घडलेल्या विमान अपघातातून सुखरूप बचावले होते, असे स्पष्ट संकेत मोदी सरकारने मंगळवारी सार्वजनिक केलेल्या

विमान अपघातातून नेताजी बचावले होते !
हैदराबाद : नेताजी सुभाषचंद्र बोस हे १८ आॅगस्ट १९४५ मध्ये तायवान येथे घडलेल्या विमान अपघातातून सुखरूप बचावले होते, असे स्पष्ट संकेत मोदी सरकारने मंगळवारी सार्वजनिक केलेल्या तीन गोपनीय फायलींपैकी एका फाईलवरून मिळाले आहेत. नेताजींनी या विमान अपघातानंतर तीनदा रेडिओवर भाषण दिल्याचा उल्लेख या फाईलमध्ये आहे. हे तिन्ही रेडिओ प्रसारण विमान अपघात घडल्यानंतरचे आहेत. त्यामुळे नेताजींच्या मृत्यूबाबतचे रहस्य अधिक गडद झाले आहे.
फाईल क्रमांक ८७०/११/पी/१६/९२/पीओएलमध्ये या रेडिओवरील प्रसारणांचा तपशील दिलेला आहे, जे नेताजींनी दिल्याचे मानले जाते. बंगालच्या गव्हर्नर हाऊसमधून या प्रसारणांचा मजकूर बाहेर आल्याची शक्यता आहे. ३१-मीटर बँडवरून उचलल्याचा दावा गव्हर्नर हाऊसमधील पी. सी. कार यांनी केल्याचा उल्लेख यात आहे.
१ जानेवारी १९४६ रोजीचे दुसरे प्रसारण
‘आम्हाला दोन वर्षांच्या आत स्वातंत्र्य मिळणारच आहे. ब्रिटिश साम्राज्यवाद पार कोसळला आहे आणि त्यांना आता भारताला स्वातंत्र्य द्यावेच लागेल. अहिंसेच्या मार्गाने भारत कधीच स्वतंत्र होणार नाही. परंतु मी गांधींचा आदर करतो.’
२६ डिसेंबर १९४५
रोजीचे पहिले भाषण
‘हल्ली मी महान जागतिक शक्तींच्या आश्रयाला आहे. माझे हृदय भारतासाठी तळमळत आहे. जेव्हा तिसरे महायुद्ध शिखरावर पोहोचले असेल तेव्हा मी भारतात जाईन. ही संधी दहा वर्षांनंतर किंवा त्याआधीही मिळू शकते. तेव्हा मी त्या लोकांना न्यायाच्या पिंजऱ्यात उभा करेल, जे लाल किल्ल्यावर माझ्या लोकांवर खटला चालवित आहेत.’
(हे प्रसारित भाषण नेताजींचेच असल्याचे मानले जाते)
फेब्रुवारी १९४६ मधील तिसरे प्रसारण
‘जपानने आत्मसमर्पण केल्यानंतर माझ्या भारतीय बंधू-भगिनींना संबोधित करण्याची ही माझी तिसरी वेळ आहे. इंग्लंडचे पंतप्रधान पेथिक लॉरेन्स आणि अन्य दोन सदस्यांना भारतात पाठवित आहेत. त्यांचा उद्देश सर्व मार्गांनी भारताचे रक्त शोषून ब्रिटिश साम्राज्यवादाची कायमस्वरूपी वसाहत निर्माण करण्याशिवाय दुसरा नाही.’