नेहरू विचार हाच काँग्रेसचा वारसा

By Admin | Updated: May 28, 2014 03:13 IST2014-05-28T03:13:04+5:302014-05-28T03:13:04+5:30

पंडित जवाहरलाल नेहरू यांची खरी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी अर्थशास्त्र हीच काँग्रेसची मूळ विचारधारा आणि वारसा

Nehru thought is the legacy of Congress | नेहरू विचार हाच काँग्रेसचा वारसा

नेहरू विचार हाच काँग्रेसचा वारसा

नवी दिल्ली : पंडित जवाहरलाल नेहरू यांची खरी धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी अर्थशास्त्र हीच काँग्रेसची मूळ विचारधारा आणि वारसा असून, नेहरूवादातील या मूल्यांना सध्याच्या राजकीय वातावरणात आव्हान दिले जात आहे, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. नेहरूंच्या ५० व्या पुण्यतिथी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व अपयशानंतर प्रथमच त्यांनी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. समाजातील सर्वात कमकुवत घटकांबाबत नेहरूंनी व्यक्त केलेल्या चिंतेलाही काँग्रेसने महत्त्व दिले आहे. लोकशाही संस्थांची उभारणी, खरी धर्मनिरपेक्षता, समाजवादी अर्थशास्त्र तसेच तटस्थ परराष्टÑ धोरण हे नेहरूवादाचे चार स्तंभ भारतीय विचारधारेचे अविभाज्य अंग राहिले आहेत. सध्याच्या राजकीय वातावरणात काही लोकांकडून या विचारांना आव्हान दिले जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ५० वर्षांपूर्वीच्या नेहरूवादी पारंपरिक विचारांचीच कास धरण्याचे कारण सध्या काँग्रेस काळाच्या फेर्‍यात अडकली आहे, असा होत नाही. खुली आणि प्रश्न उपस्थित करणारी बुद्धी असणार्‍या नेहरूंनी काळाच्या ओघातही हेच धोरण विकसित केले असले तरी त्यांचे हेच मूळ विचार कायम राहिले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला असतानाच सोनिया गांधींनी मध्य-वाम विचारधारेचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. कॉर्पोरेट जगत आणि प्रसिद्धी माध्यमांचे पूर्ण समर्थन लाभल्यानेच भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता आले, असा सूर काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत लागला असताना प्रथमच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांच्या उपस्थितीत सोनिया गांधी यांनी ठाम भूमिका मांडली. नेहरू फाळणी टाळण्यासाठी उभे ठाकले होते. देशाचे विभाजन झाल्यानंतरही भारतातील मुस्लिमांसाठी पाकिस्तानची निर्मिती झाल्याचा आणि उर्वरित भाग हिंदू राष्टÑ असल्याचा तर्क त्यांना मान्य नव्हता. सर्व जाती, धर्म, वंश आणि भाषा मिळून भारत उभा राहावा, हाच त्यांचा विचार होता. त्यांच्या या मूळ विचारांवरच अ.भा. काँग्रेस उभी राहिली आहे, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Nehru thought is the legacy of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.