नरेंद्र मोदींचा रामजप!
By Admin | Updated: May 6, 2014 15:37 IST2014-05-06T11:05:50+5:302014-05-06T15:37:39+5:30
भाजपाच्या जाहीरनाम्यात अयोध्येतील राममंदिराच्या मुद्दय़ाला अग्रक्रम नसावा, यासाठी आग्रही राहिलेल्या नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील फैझाबादेत मतांसाठी राम धून आळवली

नरेंद्र मोदींचा रामजप!
काँग्रेसची तक्रार : निवडणूक आयोगाने मागविला अहवाल
फैझाबाद : भाजपाच्या जाहीरनाम्यात अयोध्येतील राममंदिराच्या मुद्दय़ाला अग्रक्रम नसावा, यासाठी आग्रही राहिलेल्या नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील फैझाबादेत मतांसाठी राम धून आळवली. फैझाबाद येथे प्रचारसभेत मोदी यांच्या मंचावर भगवान रामाचे मोठे ‘पोस्टर’ लावण्यात आले होते. मोदी यांनी प्रत्यक्ष राममंदिर निर्मितीच्या मुद्दय़ावर कुठलेही भाष्य केले नाही, परंतु वारंवार रामनाम घेतले. त्यांनी प्रचारात धर्माचा वापर केल्याच्या मुद्दय़ावरून काँग्रेस आक्रमक झाली असून, निवडणूक आयोगाने या सभेचा अहवाल मागितला आहे.
अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी याच फैझाबाद मतदारसंघात आहे. निवडणुकीत जनतेने जिंकून दिल्यास देशात रामराज्य आणेन, असा दावा मोदींनी केला. मोदी म्हणाले, भगवान रामाच्या या भूमीतील लोक ‘प्राण जाए पर वचन न जाए’ या उक्तीवर विश्वास ठेवतात. सत्तेत असलेल्या पक्षांनी १0 कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. हे आश्वासन पूर्ण न करणार्यांना माफ करणार का, असा सवालही त्यांनी केला.
आपके मुंह मे घी-शक्कर
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मी पंतप्रधानासारखा वागतो असे म्हटले, यावर मी काय वक्तव्य देऊ. ‘आप के मुंह में घी-शक्कर’ या शब्दांत सोनिया गांधी यांचे आभार मानले. ‘दिल मांगे मोअर’ या मोदी यांच्या वक्तव्याबाबत काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपासंदर्भात मोदी यांनी प्रत्युत्तर दिले. एका गरीब महिलेचा मुलगा मागणार नाही तर करणार काय? त्यांना मत मागायला लाज वाटत असेल, परंतु मला वाटत नाही, असे ते म्हणाले.
भाषण व पोस्टरची गंभीर दखल
मोदी यांच्या फैझाबाद येथील प्रचारसभेदरम्यान त्यांचे भाषण व मंचावर लागलेल्या ‘पोस्टर’संदर्भात निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनाकडून अहवाल मागितला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी ही बाब स्पष्ट केली.
गुजरातमध्ये रामराज्य का नाही?
मोदी देशात रामराज्य आणण्याची भाषा करीत आहेत; मग त्यांनी गुजरातमध्ये रामराज्य का आणले नाही. गुजरातमध्ये अत्याचारांचे सत्र अजूनही सुरूच आहे. ते रामराज्याचा वापर फक्त मतांसाठी करीत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसच्या अखिलेश प्रतापसिंह यांनी टीका केली आहे.