पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. जम्मू ते श्रीनगर या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. तसेच सर्वांत उंच चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे लोकार्पणही पंतप्रधान मोदी यांनी केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच मोदी काश्मीर दौऱ्यावर गेले. याच दरम्यान मोदींनी पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेला स्थानिक काश्मिरी तरुण आदिलचीही आठवण काढली.
"आपला शेजारी देश मानवतेचा शत्रू आहे. पाकिस्तानने २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये मानवता आणि काश्मिरीयत दोन्हीवर हल्ला केला. पाकिस्तान आपल्या देशात जातीय दंगली घडवू इच्छितो. पाकिस्तान काश्मीरमधील कष्टकरी लोकांना त्यांच्या उपजीविकेपासून वंचित ठेवू इच्छितो."
"सर्व उद्ध्वस्त करण्याचा पाकिस्तानचा कट"
"पाकिस्तान हा असा देश आहे जो गरिबांच्या उपजीविकेच्या विरोधात आहे. त्याचा हेतू काश्मीरमधील कष्टकरी लोकांची कमाई थांबवण्याचा होता, म्हणून त्याने पर्यटकांवर हल्ला केला. पर्यटनात सातत्याने वाढ होत होती, विक्रमी संख्येने पर्यटक येत होतेय यावरच जम्मू-काश्मीरमधील लोक त्यांचं घर चालवतात, त्यामुळे पाकिस्तानने त्यांना लक्ष्य केलं. हे सर्व उद्ध्वस्त करण्याचा पाकिस्तानचा कट होता."
"दहशतवाद्यांनी आदिलला मारलं"
"दहशतवाद्यांना आव्हान देणारा आदिलही काम करण्यासाठी गेला होता. तो आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कठोर परिश्रम करत होता. पण दहशतवाद्यांनी आदिललाही मारलं. जम्मू-काश्मीरमधील लोक ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या कटाविरुद्ध उभे राहिले आहेत, जम्मू-काश्मीरमधील लोकांनी दाखवलेली ताकद हा एक संदेश आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांनी जगाला एक मजबूत संदेश दिला आहे की, येथील लोकांनी दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे" असं मोदींनी म्हटलं आहे.
"हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल”
आयफेल टॉवरचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. लोक पॅरिसमध्ये आयफेल टॉवर पाहण्यासाठी जातात आणि हा पूल आयफेल टॉवरपेक्षा खूप उंच आहे. आपण चिनाब पुलावरून काश्मीर पाहण्यासाठी जाऊ तेव्हा हा पूल एक आकर्षक पर्यटन स्थळही बनेल. सेल्फी पॉइंटवर प्रत्येकजण खूप सेल्फी काढतील. आमचा अंजी पूल देखील इंजिनिअरिंगचं एक उत्तम उदाहरण आहे. हा भारतातील पहिला केबल सपोर्टेड पूल आहे. हे दोन्ही पूल केवळ विटा, सिमेंट, स्टील आणि लोखंडापासून बनवलेले नाहीत. हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचं चित्र आहे."