नांद न्यूज
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:01+5:302014-12-25T22:41:01+5:30
चोरविहिरा जलाशयाचा फायदा काय?

नांद न्यूज
च रविहिरा जलाशयाचा फायदा काय?शेतकऱ्यांचा सवाल : वन विभागाच्या आडकाठीमुळे शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाहीनांद / भगवानपूर : उमरेड वन परिक्षेत्राच्या दक्षिण भागात ४० वर्षांपूर्वी चोरविहिरा क्र. २ जलाशय तयार करण्यात आले. मात्र वन विभागाने आडकाठी आणल्याने त्या जलाशयातून शेतीपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. परिणामी या जलाशयाचा फायदा काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या ४० वर्षांपूर्वी चोरविहिरा जलाशय बांधण्यात आले. या जलाशयाची सिंचन क्षमता १५०० हेक्टरची आहे. जलाशय पूर्णत्वास आल्यानंतर मुख्य कालव्याचे खोदकामाला सुरुवात करण्यात आली. वन विभागाच्या हद्दीतून १००० मीटर लांब अंतरापर्यंत हा कालवा जातो. यापैकी ८०० मीटरचे खोदकाम करण्यात आले. उर्वरित २०० मीटरचे काम शिल्लक असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोदकाम करण्यास मज्जाव केला. तेव्हापासून ते काम बंद असून २०० मीटरसाठी शेतीला पाणी पोहोचू शकले नाही. वन विभागाने आडकाठी आणल्यामुळे किमान शेतातील कालव्याचे काम पूर्ण करण्याच्या कामी कंत्राटदार लागला. त्याने शेतातून जाणाऱ्या कालव्याचे काम केले. मात्र २०० मीटरचे खोदकाम होऊन तो कालवा जोडला जात नाही, तोपर्यंत त्या कालव्याचा काहीएक फायदा होऊ शकत नाही. गेल्या ४० वर्षांपूर्वी हे काम करण्यात आले. तेव्हापासून ते बंदस्थितीत असल्याने सध्या ते कालवेसुद्धा जमीनदोस्त झाल्याचे दिसून येते. बऱ्याच ठिकाणी कालवा नेमका कुठे होता, हे कळायला मार्ग नाही. या जलाशयाच्या काही अंतरावर चोरविहिरा क्र. १ हे जलाशय आहे. त्या जलाशयाची निर्मितीसुद्धा त्याच कालावधीत झाली. त्या जलाशयाचा कालवासुद्धा वन विभागाच्या जागेतून जातो. मात्र त्यास वन विभागाने विरोध केला नाही. त्याचा शेतीसाठी लाभ होत असला तरी त्याची सिंचन क्षमता केवळ ५०० हेक्टर आहे. दुसरीकडे मोठ्या जलाशयाच्या मार्गात आडकाठी आणल्याने १५०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या जलाशयाकडे सिंचन विभागाने लक्ष देऊन त्वरित काम पूर्ण करावे, जलाशयाचा फायदा शेतीला होईल यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)