भारतातील मुस्लिम अल कायदा संपवतील - मोदींना विश्वास
By Admin | Updated: September 30, 2014 11:01 IST2014-09-30T09:36:39+5:302014-09-30T11:01:17+5:30
भारतातील मुस्लीम समाज अल कायदाचा दहशतवाद कधीही यशस्वी होवू देणार नाही असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

भारतातील मुस्लिम अल कायदा संपवतील - मोदींना विश्वास
>ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. ३० - भारताविरोधात लढण्याची घोषणा करणा-या अल कायदा या दहशतवादी संघटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिले आहे. भारतातील मुस्लीम समाज अल कायदाचा दहशतवाद कधीही यशस्वी होवू देणार नाहीत, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. काऊंसिल फॉरेन रिलेशनला (सीएफआर) संबोधित करताना त्यांनी भारतीय मुस्लिम अल कायदाचा हा दहशतवाद संपवतील, असे सांगितले. यावेळी त्यांनी दहशतवाद, सीमावाद यासारख्या विविध विषयांवरील प्रश्नांनार उत्तरे दिली.
दहशवाद हा फक्त दहशतवाद असतो, त्यात चांगले किंवा वाईट असे काहीही नसते. सर्व देशांनी धर्म, जात विसरून मानवतेच्या आधारावर एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढा दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
भारतीय भूमी ही बुद्ध, महात्मा गांधी यांची आहे, त्यामुळे भारतातील नागरिक कधीच दहशतवादी संघटनांना साथ देणार नाहीत, असे ते म्हणाले. देशातील मुस्लीम समाजावर देशाचा पूर्ण विश्वास आहे, अल कायदाचा हा दहशतवाद भारतातील मुस्लिम समाज कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यापूर्वीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही मोदींनी अल कायदाला सडेतोड उत्तर दिले होते. भारतातील मुस्लिम देशासाठी जगतील आणि प्रसंगी देशासाठी बलिदानही देतील, असा विश्वास त्यांनी त्या मुलाखतीत व्यक्त केला होता.