Marathi Crime News: आईने मोबाईल वापरू नको म्हणून हटकले. ते १५ वर्षाच्या मुलीला इतकं वाईट वाटलं की तिने आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेतला. आईने मोबाईल वापरू नको म्हटल्यामुळे रागाच्या भरात या मुलीने थेट २०व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. बंगळुरूतील काडूगोडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अवंतिका चौरसिया असे मयत मुलीचे नाव असून ती दहावीच्या वर्गात शिकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवंतिकाचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील आहे. अवंतिकाचे वडील इंजिनिअर आहेत, तर आई गृहिणी आहे.
आईने मुलीला मोबाईल वापरण्यावरून का हटकले?
अवंतिका एका खासगी शाळेत शिकत आहे. चाचणी परीक्षेत तिला कमी गुण मिळाले. १५ फेब्रुवारीपासून तिची दहावीची परीक्षा सुरू होणार होती. पण, अवंतिका मोबाईलवर वेळ घालवताना दिसत होती. हे बघितल्यानंतर तिच्या आईने हटकले.
अभ्यासाकडे लक्ष दे, मोबाईलमध्येच वेळ वाया घालवू नको, असे अवंतिकाला तिची आई म्हणाली. आई असं का बोलली म्हणून अवंतिकाला राग आला. त्यानंतर अवंतिकाने २०व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोडूगोडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी अवंतिकाच्या आईवडिलांचा जबाब नोंदवला जाणार आहे. प्राथमिक तपासातून आई मोबाईल वापरण्यावरून बोलल्याच्या रागातून अवंतिका आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
६ फेब्रुवारी रोजीही एका १९ वर्षीय विद्यार्थीने हॉस्टेलच्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना बंगळुरूमध्ये घडली होती. १९ वर्षीय अनामिका विनीत बीएससी नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होती. ती मूळची केरळची होती. रामनगर येथील हॉस्टेलमध्ये तिने आत्महत्या केली होती.