मोदी वाराणसी राखणार, बडोद्यातील खासदारकी सोडणार
By Admin | Updated: May 29, 2014 13:14 IST2014-05-29T12:49:54+5:302014-05-29T13:14:45+5:30
लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील बडोदा भरघोस मताधिक्याने विजय मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बडोदा येथील खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

मोदी वाराणसी राखणार, बडोद्यातील खासदारकी सोडणार
ऑनलाइन टीम
अहमदाबाद, दि. २९ - लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील बडोदा आणि उत्तरप्रदेशमधील वाराणसीतून भरघोस मताधिक्याने विजय मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता वाराणसीची खासदारकी राखत बडोदा येथील खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. या जागेवरुन आता मोदींचे विश्वासू साथीदार अमित शहा यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे.
पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींना दोन्हीपैकी एका मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. गुजरात हा मोदींचा बालेकिल्ला आहे. तर उत्तरप्रदेशमध्ये भाजपला ८० पैकी ७३ जागा मिळाल्या असून हे मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवल्याने शक्य झाले होते. त्यामुळे मोदींनी आता गुजरातऐवजी उत्तरप्रदेशकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे मोदी वडोदरा मतदारसंघातून राजीनामा देतील असे सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी बडोदा व वाराणसी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. बडोदा हा मोदींचा गड असल्याने या मतदार संघातून त्यांचा विजय निश्चित होता. या मतदारसंघात त्यांनी काँग्रेसच्या मधुसूदन मिस्त्री यांना तब्बल साडे पाच लाखांहून अधिक मतांनी धूळ चारत विजय मिळवला होता. तर वाराणसीत मोदींनी आपच्या अरविंद केजरीवाल यांच्यावर सुमारे चार लाख मतांनी विजय मिळवला होता.
अद्याप मोदी किंवा भाजपने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मोदींनी राजीनामा दिल्यास या मतदारसंघात पुन्हा निवडणूक होईल. यात भाजपकडून उमेदवार म्हणून अमित शहांचे नाव आघाडीवर आहे.