गंगा स्वच्छ करण्यासाठी मोदी सरकारची तीन वर्षांची डेडलाईन
By Admin | Updated: August 20, 2014 18:36 IST2014-08-20T18:36:07+5:302014-08-20T18:36:07+5:30
गंगा नदी आगामी तीन वर्षात स्वच्छ करु अशी ग्वाही केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी दिली असून सहा महिन्यांत या मोहीमेला सुरुवात होईल असे त्यांनी म्हटले आहे.

गंगा स्वच्छ करण्यासाठी मोदी सरकारची तीन वर्षांची डेडलाईन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - गंगा नदी आगामी तीन वर्षात स्वच्छ करु अशी ग्वाही केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी दिली असून गंगा नदीत औद्योगिक कंपन्यांकडून सोडल्या जाणा-या प्रदुषित सांडपाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे उमा भारतींनी म्हटले आहे.
बुधवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. गंगेतील पाणी हे प्राण्यांसाठीही उपयुक्त राहिलेले नाही हे दुर्दैवच आहे अशा शब्दात त्यांनी गंगा नदीतील प्रदषणावर नाराजी व्यक्त केली. गंगा स्वच्छता अभियान सहा महिन्यांत सुरु होईल. तीन वर्षांत गंगेचे पाणी प्रदुषणमुक्त असेल असे आश्वासन त्यांनी दिले. गंगेत कारखान्यांमधून सोडल्या जाणा-या सांडपाण्यासाठी इन्वायरमेंट फ्लो ही योजना राबवली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यमूना नदीतील प्रदुषणाच्या समस्येवर कायमस्वरुप तोडगा काढण्यासाठी दिल्ली सरकारला आमच्या मंत्रालयातर्फे सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल असे त्यांनी नमूद केले.
नदी जोड प्रकल्प राबवताना पर्यावरणाची हानी आणि नदीतील जीवजंतूंना धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसेच लोप पावलेल्या नद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवू असेही उमा भारती यांनी सांगितले.