उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यातील चैल मतदारसंघाच्या आमदार पूजा पाल यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. जर काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पूजा पाल यांनी पत्रात म्हटले आहे की, त्यांचे पती राजू पाल यांच्याप्रमाणेच त्यांचीही हत्या होऊ शकते. जर असे घडले, तर त्याचे खरे गुन्हेगार समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांना मानले जावे. या पत्रात त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यामुळे समाजवादी पक्षाच्या गुन्हेगार समर्थकांचे मनोबल वाढले असल्याचे त्या म्हणतात. तसेच आपल्या पतीच्या खुन्यांना शिक्षा मिळवून देण्याचे ध्येय पूर्ण केले आहे आणि आता त्यांना मरण आले तरी अभिमान वाटेल.
पूजा पाल यांनी १६ जानेवारी २००५ रोजी बसपा आमदार राजू पाल यांच्याशी विवाह केला होता. परंतु, लग्नानंतर अवघ्या ९ दिवसांनी २५ जानेवारी २००५ रोजी राजू पाल यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पूजा पाल यांनी अतिक अहमद आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पतीच्या हत्येनंतर पूजा पाल यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी २००७ आणि २०१२ मध्ये अलाहाबाद शहर (पश्चिम) मतदारसंघातून बसपाच्या आमदार म्हणून विजय मिळवला. मात्र, २०१७ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०२२ च्या निवडणुकीत त्या सपाच्या तिकिटावर चैल विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या.