नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी व जनतेचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल नेटवर्किंगची कास धरण्याचे निश्चित केले आहे. सर्व केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयाचे टिष्ट्वटरवर अकाऊंट उघडावे तसेच ‘फेसबुक पेज’ तयार करण्याची सूचना मोदींनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी सोशल नेटवर्किंगद्वारे प्रचारात आघाडी घेतली होती. आता केंद्र सरकारचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्यासाठी मोदींनी पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंगचा आग्रह धरला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंत्रालयाच्या योजनांची सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी. त्यात काही बदल अपेक्षित असल्यास लोकांनी सूचना कराव्यात, असे मोदींना वाटते. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून लोकांचा ‘फीडबॅक’ घेणे तसेच तज्ज्ञांच्या सूचनांचीही दखल घेण्याचे मोदींनी त्यांच्या सहकार्यांना सांगितले आहे. नरेंद्र मोदी गेल्या दोन वर्षांपासून टिष्ट्वटरवर आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांचेही टिष्ट्वटरवर अकाऊंट आहे. देशातील १६० लोकसभा मतदारसंघात सोशल नेटवर्किंगचा वापर करणार्यांची मोठी संख्या असल्याचे मोदी टीममधील व्यवस्थापन तज्ज्ञांचे मत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मंत्र्यांनो, ‘सोशल नेटवर्किंग’ची कास धरा!
By admin | Updated: May 30, 2014 03:11 IST