मेट्रो रेल्वेला मिळाली गती -१
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:10+5:302014-12-25T22:41:10+5:30

मेट्रो रेल्वेला मिळाली गती -१
> मेट्रो रेल्वेला मिळाली गती प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन : प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास नागपूर : नागपुरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्प हा लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी मौजा लेंड्रा दीक्षाभूमीसमोर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची शासन कटिबद्ध आहे. मूळ ८६८० कोटी रुपयाचा हा प्रकल्प १० हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन हे तिघेही मिळून हा प्रकल्प पूर्ण करणार आहेत. त्यासाठी शासनाने एसपीव्हीची स्थापना केली आहे. दीक्षित नावाचे रेल्वेचे अधिकारी यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी काही जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. परंतु जी जागा खाली आहे, त्यावर कामाला तातडीने सुरुवात केली जाईल आणि सोबतच जमीन अधिग्रहणाचेही काम सुरू राहील. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प व महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करून राज्य शासनाने ३० जानेवारी २०१४ रोजी आणि केंद्र शासनाने २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पास मंजुरी प्रदान केली आहे. मेट्रो प्रकल्प हा सन २०१८ पर्यंत कार्यान्वित करावयाचा आहे. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे आयोजित या भूमिपूजन सोहळ्यास महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर, मनपा आयुक्त श्याम वर्धने, नासुप्रचे सभापती डॉ. हर्षदीप कांबळे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार प्रामुख्याने उपस्थित होते.