सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: पहलगाम हत्याकांडाला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या हल्ल्यामुळे ६ मेची रात्र पाकिस्तानसाठी ‘कयामत की रात’ ठरली, असे खडेबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सुनावले. पाकिस्तानने पहलगाममध्ये ‘इन्सानियत’ (मानवता) आणि ‘काश्मीरियत’ अशा दोन्ही गोष्टींवर हल्ला केला. त्यामागे भारतात दंगे घडविण्याचा व काश्मीरमधील मेहनती लोकांच्या हातातील रोजगार हिरावण्याचा डाव होता. त्यामुळेच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, अशी टीकाही मोदी यांनी केली.
जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वांत उंच पुलाचे, अंजी पुलाचे तसेच कटऱ्याहून श्रीनगरकडे जाणाऱ्या वंदे भारत रेल्वे सेवेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमात मोदी यांनी सांगितले की, काश्मीरमधील रेल्वेचा कार्यक्रम हा भारताच्या एकतेचा व इच्छाशक्तीचा भव्य उत्सव आहे. काश्मीर खोरे आता भारताच्या रेल्वे जाळ्याशी जोडले गेले. गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटक विक्रमी संख्येने येत आहेत. पर्यटन गरिबांच्या स्वयंपाकघराला इंधन पुरवते. त्यामुळेच पाकिस्तानने घाला घालण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडात १५ ते १७ जून दरम्यान होणाऱ्या जी-७ शिखर संमेलनात सहभाग घेतील. कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधानांना फोन करून हे आमंत्रण दिले.