दिल्लीत अनेक दिग्गज बेघर होणार
By Admin | Updated: May 19, 2014 03:30 IST2014-05-19T03:30:48+5:302014-05-19T03:30:48+5:30
अनेक प्रमुख नेत्यांना १६व्या लोकसभेत पराभवाची धूळ चाखावी लागल्याने त्यांना देशाच्या राजधानीत वास्तव्यापासून अनेक प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो.

दिल्लीत अनेक दिग्गज बेघर होणार
फराज अहमद, नवी दिल्ली - अनेक प्रमुख नेत्यांना १६व्या लोकसभेत पराभवाची धूळ चाखावी लागल्याने त्यांना देशाच्या राजधानीत वास्तव्यापासून अनेक प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. त्यातील बहुतांश नेते दिल्लीत कायम वास्तव्यास आहेत. माजी रेल्वेमंत्री आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांच्यावर घर देता का घर, असे म्हणण्याची वेळ आली आहे. रांचीच्या न्यायालयाने पशुखाद्य घोटाळ्याबाबत दोषी ठरविल्याने लालूप्रसाद यादव यांना निवडणूक लढविता आली नाही. त्यांनी पत्नी राबडीदेवी आणि मुलगी मिसा यांना उभे केले; पण त्यांच्या वाट्याला पराभव आला. त्यामुळे त्यांना २५ तुघलक रोड येथील बंगला लवकरच रिकामा करावा लागेल. मोदी सरकार त्यांच्यावर दया दाखविण्याची शक्यता कमीच आहे. राजदचे चार उमेदवार निवडून आले. त्यातील बुलो मंडल हे पहिल्यांदाच खासदार बनल्याने त्यांना बंगला मिळणार नाही. तसलीमुद्दीन आणि पप्पू यादव यांच्याशी लालूप्रसाद यांचे फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. हे दोघेही याआधी केवळ राज्यमंत्री राहिले असल्याने ते टाईप आठ बंगल्यासाठी पात्रही ठरणार नाहीत. लालूंचे एकेकाळचे गुरू संयुक्त जदचे अध्यक्ष शरद यादव हेसुद्धा एकाच नावेतील प्रवासी आहेत. ते जबलपूरच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले होते. ते १९७४पासून दिल्लीत राहतात. केवळ १३ महिने चाललेली १२वी लोकसभा वगळता ते सातत्याने लोकसभेवर निवडून आले होते. १५व्या लोकसभेत जेडीयूचे २० खासदार होते. त्या वेळी शरद यादव यांच्यासह केवळ आठ जणांना बंगले मिळाले होते. या सर्वांना आता ते रिकामे करावे लागतील. समाजवादी पक्षाचे २१ खासदार होते. आता केवळ दोन आहेत. जयाप्रदा आणि कुंवर रेवतीरमण सिंग यांना बंगले मिळाले होते. या पक्षाचे बहुतांश खासदार साऊथ आणि नॉर्थ एव्हेन्यूवरील फ्लॅट्समध्ये राहतात.