पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मुसंडी मारली आणि गेल्या वेळेच्या आपल्या सर्व १९ जागा कायम राखत डाव्या आघाडीकडून १५ जागा खेचून नेल्या. मोदींनी झंजावाती प्रचार करूनही भाजपाला केवळ दोन जागांवरच समाधान मानावे लागले. डाव्या आघाडीचे या वेळी पूर्णत: पानिपत झाले असून, क्राँग्रेसलाही आपल्या दोन जागा गमवाव्या लागल्या. या जागा माकपने हिसकावल्या. राज्यात या वेळी कधी नव्हे तो जातीय ध्रुवीकरणाचा फॅक्टर चालला. नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी या दोघांनीही जातीचे कार्ड या निवडणुकीत वापरून घेतले. तसे पाहता राज्यात चौरंगी लढत वाटत होती. पण जातीय ध्रुवीकरणात काँग्रेस बॅकफूटवर राहिली आणि डाव्या पक्षाचा पार धुव्वा उडाला. भाजपाने राज्यात जम बसविण्यासाठी हिंदू कार्डचा वापर केला. सीमावर्ती भागातील बांगलादेशी मुस्लिमांना राज्यातून हुसकावून लावण्याची भाषा केली. गोरखाचे प्राबल्य असलेल्या वरच्या पट्ट्यात स्वतंत्र गोरखा लॅन्डचे गाजर दाखवून मोदींनी हा भाग आपल्याकडे वळविला. नंतर ममता बॅनर्जींवर जोरदार हल्ला चढवून तृणमूलच्या व्होट बँकेतही शिरकाव केला. मोदींची ही खेळी काही अंशी यशस्वी ठरून या पक्षाला आपले सदस्यबळ एकवरून दोनवर नेता आले. राज्यातील आपल्या मतांची टक्केवारी वाढविण्यासाठीही मोदींना या डावपेचांची मदत झाली. भाजपाकडून चौफेर हल्ला होत असतानाही ममतांनी आपल्या व्होट बँकेला धक्का लागू दिला नाही. मुस्लीम कार्ड खेळत असतानाच डाव्यांवर नाराज असलेला वर्ग आपल्याकडे खेचण्यात त्या यशस्वी ठरल्या. काँग्रेसशी फारकत घेतल्यावरही या दोन पक्षांत मतविभाजन होऊ शकले नाही हे विशेष. तृणमूलला ३० जागा मिळण्याची खात्री होती. ममतांच्या अपेक्षेपेक्षाही या पक्षाला जास्त यश मिळाले आणि माकपाचे पानिपत झाले. याचाच अर्थ डाव्यांवर नाराज असलेला वर्ग भाजपाकडे न जाता पुन्हा तृणमूलकडेच वळला. ‘केंद्रात मोदी, राज्यात मात्र ममताच’ ही राज्यातील मतदारांची मानसिकता आधीच बनलेली होती. त्याचे प्रतिबिंब निकालात दिसून आले.
‘एम फॅक्टर’वर भारी पडल्या ममता बॅनर्जी
By admin | Updated: May 17, 2014 04:31 IST