बंगळुरू - आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे विजयी सोहळ्याला गालबोट लागले. या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेवरून देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाचे उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने दिले आहेत. त्याशिवाय कर्नाटक सरकारने या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांसह इतर बड्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची मोठी कारवाई केली आहे.
बंगळुरूतील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्या. माइकल कुन्नाह यांच्या नेतृत्वावाली तपास आयोग स्थापन केला आहे. न्या. कुन्नाह या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणार आहेत. त्याशिवाय या घटनेवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. सरकारने या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. कब्बन पार्क एसीपी, सेंट्रल झोन डीसीपी, अतिरिक्त पोलीस आयुक्त वेस्ट झोन, बंगळुरू पोलीस आयुक्त, स्टेशन हाऊस मास्टर, कब्बन पार्क पोलीस निरीक्षक यांचा समावेश असून या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.
माहितीनुसार, सुरक्षेचा हवाला देत पोलिसांनी हा इव्हेंट करण्यात परवानगी दिली नव्हती. त्याशिवाय आरसीबीलाही ४ जूनला कार्यक्रम घेण्यास मनाई केली होती. तरीही या प्रकरणाचे खापर पोलिसांवर फोडण्यात आले असून अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरसीबी, केएससीए आणि इव्हेंट आयोजित करणाऱ्या डिएनए कंपनीच्या प्रतिनिधींना अटक केली आहे. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करू असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना खेळला गेला. त्यात पंजाब किंग्स टीमला हरवून पहिल्यांदाच आरसीबीने विजेतेपदावर नाव कोरले. याचाच आनंद साजरा करण्यासाठी ४ जूनला बंगळुरूत विजयी परेड आयोजित केली होती. संध्याकाळी ही विजयी परेड बंगळुरू विधानसभेतून चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत जाणार होती. परंतु रस्त्यावर चाहत्यांची मोठी गर्दी पाहता ही विजयी परेड रद्द करून खेळाडू थेट स्टेडियमला पोहचले. यात खेळाडूंना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी प्रचंड गर्दी केली. त्यातच स्टेडियमबाहेरही मोठी गर्दी झाली. त्यात चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांना आपला जीव गमवावा लागला.