भूसंपादनावरून पेच!
By Admin | Updated: February 26, 2015 03:11 IST2015-02-26T03:11:06+5:302015-02-26T03:11:06+5:30
भूसंपादन विधेयकाच्या विरोधात काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याने मोदी सरकारवरील दबाव कमालीचा वाढला आहे. काँग्रेसने बुधवारी जंतरमंतरवर

भूसंपादनावरून पेच!
नवी दिल्ली/मुंबई : भूसंपादन विधेयकाच्या विरोधात काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याने मोदी सरकारवरील दबाव कमालीचा वाढला आहे. काँग्रेसने बुधवारी जंतरमंतरवर आंदोलन करताना या शेतकरीविरोधी विधेयकाला सर्वशक्तिनिशी विरोध करण्याचे ऐलान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे आपले आक्षेप नोंदविले; तर केंद्रात व राज्यातही सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने विधेयकाचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवा, असा स्पष्ट आदेशच जिल्हाप्रमुखांना दिला आहे.
विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने ‘जमीन वापसी’ रॅलीचे आयोजन करताना अण्णा हजारे यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाची याद जागवली. अण्णांनी दिल्लीतील जंतरमंतरवर भूसंपादन विधेयकाविरुद्ध दोन दिवस आंदोलन केले होते. काँग्रेसनेही जंतरमंतरवरच आंदोलन केले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीविना झालेल्या बुधवारच्या आंदोलनात दिग्विजयसिंग, राज बब्बर, जयराम रमेश आणि सुबोधकांत सहाय यांच्यासह अंदाजे दोन हजार कार्यकर्ते सामील झाले होते.
> उद्धव म्हणतात, रान उठवा
जमीन संपादन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, ही बाब गावागावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या संपर्कप्रमुखांना दिला. नव्याने नेमलेल्या संपर्कप्रमुखांची ठाकरे यांनी बैठक घेतली. सध्या केंद्रात व राज्यात काय सुरू आहे ते वेगळे सांगायची गरज नाही, असे नमूद करून ठाकरे यांनी जमीन संपादन कायद्यातील काही बदलांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहिली असून, यापुढेही राहणार असे त्यांनी बजावले.
> मोदी सरकारने जे भूमी अधिग्रहण विधेयक मांडले आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला या तीन मुद्यांवर आक्षेप आहे. सरकारसोबत जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा बदल आम्हाला अजिबात मान्य नाही, असे आम्ही सांगू. या बदलाला आमचा विरोध असल्याने विधेयकालाही आम्ही विरोध करू. - शरद पवार