लालू-नितीश दिलजमाई
By Admin | Updated: June 8, 2015 01:43 IST2015-06-08T01:43:02+5:302015-06-08T01:43:02+5:30
बिहारमध्ये सत्तारूढ संजद (जेडी- यू) आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजदने एकत्रितपणे लढण्याचा आणि जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

लालू-नितीश दिलजमाई
नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्तारूढ संजद (जेडी- यू) आणि लालूप्रसाद यादव यांच्या राजदने एकत्रितपणे लढण्याचा आणि जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात दोन तास चाललेल्या चर्चेनंतर समाजवादी पार्टीचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी त्याबाबत माहिती दिली. जागावाटपाबाबत चर्चेसाठी स्थापन समितीतील सहा सदस्यांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी तीन सदस्यांचा समावेश राहणार असून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल कोणताही वाद नसून नंतर या बाबींकडे बघितले जाईल, असे ते म्हणाले.
बिहार हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील राज्य असून भाजपने सत्ता हिसकावून घेण्यासाठी चालविलेली तयारी पाहता मुलायमसिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी या दोन नेत्यांनी चर्चा केली. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळणार असेल तर स्वत: १०० जागा सोडून राजद, काँग्रेस, डावे व इतरांसाठी बाकीच्या १४३ जागा सोडण्याची नितिश कुमार यांची तयारी आहे. पण यास लालू प्रसादांचा विरोध आहे. कारण नितिश कुमार यांचे नाव आधीच जाहीर केले तर दलित व महादलित समाजात वजन असलेल्या जितनराम मांझी यांना सोबत घेण्यात अडचणी येतील, असे लालूंना वाटते. दुसरीकडे मांझी यांना जवळ करण्याचा काँग्रेसचाही प्रयत्न सुरु आहे.(वृत्तसंस्था)
नितीशकुमार राहुल गांधींना भेटले
> नितीशकुमार यांनी नंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे भाजपविरुद्ध व्यापक धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याच्या चर्चेला जोर चढला आहे. नितीशकुमार आणि राहुल यांनी तासभर चर्चा केली असली तरी त्याचा तपशील बाहेर आलेला नाही.
> बिहारमध्ये धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याला अनुकूलता दर्शवतानाच राजद आणि संजदची युती होऊ न शकल्यास नितीशकुमार यांच्यासोबत जाण्याचा मार्ग अवलंबणार असल्याचे काँग्रेसने याआधीच स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी नितीशकुमार यांना झुकते माप दिल्याचे संकेत त्यातून दिले गेले आहेत.
>मुख्यमंत्रिपदाला बगल...
नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर लालूप्रसाद आणि नितीशकुमार प्रथमच एकत्र आले. हा मुद्दा नंतर सोडविला जावा, यावर लालूप्रसाद ठाम राहिले आहेत. त्यामुळे तूर्तास मुख्यमंत्रिपदाच्या मुद्याला बगल दिली गेल्याचे स्पष्ट झाले.